Metro Stations: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार वेगवेगळी पावले उचलत आहे. यातीलच एक पाऊल म्हणजे सहकारी संस्थांच्या माध्यमातून कमी दरात गहू, तांदूळ, डाळी आणि कांदे उपलब्ध करुन देणे. आता सरकार दिल्ली मेट्रो स्थानकांवर (Delhi Metro Station) खाद्यपदार्थांची दुकाने सुरू करण्याच्या तयारीत आहे. या दुकानांमधून खाद्यपदार्थांची परवडणाऱ्या किंमतीत विक्री केली जाणार आहे. दिल्लीनंतर मुंबई, चेन्नई आणि बंगळुरु येथील मेट्रो स्थानकांवरही खाद्यपदार्थांची दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. ही खाद्य दुकाने NCCF च्या माध्यमातून चालवली जातील.


सरकार दिल्ली मेट्रो स्थानकांवर खाद्यपदार्थांची दुकाने सुरू करणार आहे, जेणेकरून लोकांना परवडणाऱ्या किंमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध होऊ शकतील. दिल्लीनंतर मुंबई, चेन्नई आणि बंगळुरु येथील मेट्रो स्थानकांवरही खाद्यपदार्थांची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यामुळं सर्वसामान्यांना कमी दरात पदार्थ उपलब्ध होतील. 


राजीव चौक स्थानकात पहिले खाद्यपदार्थांचे दुकान सुरू होणार 


गहू, तांदूळ, डाळी, साखर, कांदा या अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती हा केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. हे खाद्यपदार्थ परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावेत यासाठी सरकार दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्टेशनवर पहिले फूड स्टोअर उघडणार आहे. मेट्रो स्टेशनवर खाद्यपदार्थांचे दुकान उघडण्याचे उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांना परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे.


दिल्ली मेट्रो स्थानकांवर 20 खाद्य दुकाने सुरु होणार 


दिल्ली मेट्रो स्थानकांवर सुमारे 20 खाद्यपदार्थांची दुकाने उभारली जाणार आहेत. ती नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) मार्फत चालवली जातील. सध्या एनसीसीएफ अनुदानित खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी शहरांमध्ये मोबाईल व्हॅन चालवते. परंतु, याद्वारे मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचता येते. मेट्रो स्थानकांवरील खाद्यपदार्थांची दुकाने अधिक लोकांना कमी किंमतीच्या खाद्यपदार्थांचा लाभ घेण्यास सक्षम करतील.


फार्मास्युटिकल आणि कृषी उत्पादनांसह अन्नधान्याची विक्री


नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया ही एक सरकारी संस्था आहे. जी सरकारच्या वतीने अन्नधान्य, डाळी, मसाले, तेल, औषधी वस्तू आणि इतर ग्राहक संबंधित कृषी वस्तूंची बाजारभावापेक्षा कमी किमतीत विक्री करते. हे अन्नधान्य सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करते.


मुंबई, चेन्नईसह अनेक शहरांमध्ये उघडण्याची योजना 


मेट्रो स्थानकांवर ही दुकाने उघडून, मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीचा लाभ घेण्यास मदत करण्याचा सरकारचा मानस आहे. दिल्लीमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून खाद्यपदार्थांची दुकाने सुरू करण्यात येत आहेत. त्याच्या यशानंतर, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरू सारख्या इतर शहरांच्या मेट्रो स्थानकांमध्ये ही खाद्यपदार्थांची दुकाने उघडण्याची योजना आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


अन्नधान्य सुरक्षेच्या मुद्यावर WTO मंत्रीस्तरीय परिषदेत मंत्री पियुष गोयल यांचे खडेबोल; म्हणाले...