PM Kisan Mandhan Yojana: देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार (Govt)  विविध योजना आखत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत बदल घडवूण आणण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, अशीच एक योजना म्हणजे  'किसान मानधन योजना'. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही योजना राबवली जाते. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती. 


योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची तरतूद 


केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे 'किसान मानधन योजना' (Kisan Mandhan Yojana). या योजनेअंतर्गत वयाची 60 वर्षे ओलांडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते. सामान्यत: उतारवयात शेतकऱ्यांना शेती करता येत नाही, तेव्हा त्यांना आर्थिक मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने 'किसान मानधन योजना' सुरु केली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली, ज्याचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (SMF) पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा 1500 रुपये देण्याचीही तरतूद आहे.


दरमहा भरावे लागणार 55 रुपये 


18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची नोंदणी करू शकतात. शेतकरी कितीही वयात या योजनेचा भाग बनले तरी त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील. यानंतर, वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जाते. याद्वारे ते त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकतात.


छोट्या शेतकऱ्यांना दिलासा


देशातील अन्नदाता आर्थिक संकटामुळे मृत्यूला कवटाळत असताना ही योजना शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरत आहे. 'किसान मानधन' योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात.


कसा कराल अर्ज? 


अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेत खसराआणि बँक खाते पासबुक असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना सर्वप्रथम 'किसान मानधन योजने'च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला होम पेजवर जाऊन लॉगिन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर त्यामध्ये मागितलेली आवश्यक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल जो तुम्हाला टाकावा लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.