नवी दिल्ली: कोरोना काळात कृषी आणि फार्मा क्षेत्रांनं निर्यातीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली असून त्याची ही गती कायम राखण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य सचिव अनूप वाधवान यांनी केलं. भारत पुन्हा एकदा कोरोना काळापूर्वीच्या चांगल्या स्थितीत पोहचण्याचे हे संकेत असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं. चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज संबंधित संस्थेनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.


वाणिज्य सचिव अनूप वाधवान यांनी सांगितलं की, "निर्यातीचा विचार केल्यास काही क्षेत्र उल्लेखनिय कामगिरी करत आहेत. अर्थव्यवस्थेत मंदी आल्यानंतरही कृषी आणि फार्मा क्षेत्रांच्या निर्यातीत वाढ झाली."


खराब कामगिरी करणाऱ्या क्षेत्रावर लक्ष
अनूप वाधवान म्हणाले की, "या काळात काही क्षेत्रांचे प्रदर्शन काही चांगले झाल्याचं दिसून आलं नाही. या मंदीच्या काळात ज्या क्षेत्रांनी चांगलं प्रदर्शन केलं त्यांचा विकास कायम ठेवण्याची गरज आहे. तसेच ज्या क्षेत्रांनी या काळात सुमार प्रदर्शन केलं आहे त्यांच्यावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे. कोरोनापूर्वी त्यांची जी स्थिती होती त्या स्थितीत त्यांना आणण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या क्षेत्रांचा विकास कमी काळात शक्य आहे त्यांत तातडीनं गुंतवणूक करण्याची गरज आहे. तर काही मध्यम आणि दीर्घ काळात विकसीत होणाऱ्या क्षेत्रांची क्षमता वाढवण्याची गरज आहे."


नोव्हेंबर महिन्यात निर्यातीत 8.74 टक्क्यांची घसरण
नोव्हेंबर महिन्यात देशाच्या निर्यातीत 8.74 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. काही महत्वपूर्ण क्षेत्रातील कमी झालेल्या निर्यातीमुळे ही घसरण पहायला मिळते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं सुमारे 1.73 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. पेट्रोलियम, इंजिनीअरिंग, केमिकल्स आणि जेम्स अॅन्ड ज्वेलरी या क्षेत्रांच्या निर्यातीत घसरण झाली आहे.


महत्वाच्या बातम्या: