Adani Group : अदानी समूह (Adani Group) बिहारमध्ये (Bihar) विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. हा समूह सिमेंट उत्पादन, लॉजिस्टिक आणि कृषी-उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. अदानी समूह येत्या काही दिवसांत बिहारमध्ये 8700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी (Pranav Adani) यांनी दिली.  बिहारमध्ये सुरु असलेल्या दोन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या दुसऱ्या दिवशी बिहार बिझनेस कनेक्ट - 2023 ला संबोधित प्रणव अदानी बोलत होते.


10,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळणार रोजगार


शिखर परिषदेला संबोधित करताना प्रणव अदानी म्हणाले की, अदानी समूहाने बिहारमध्ये 850 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता समूहाने सिमेंट उत्पादन, लॉजिस्टिक आणि कृषी-उद्योग यासारख्या अतिरिक्त क्षेत्रांमध्ये 8700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळं राज्यातील सुमारे 10,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. दरम्यान, अदानी ग्रुपने बिहारमध्ये आधीच 850 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता गुंतवणूक 10 पट वाढवण्याची तयारी केली आहे.


बिहारमधील गुंतवणूक 10 पटीने वाढवण्याचा निर्णय


प्रणव अदानी म्हणाले की, बिहार हे देशातील अतिशय आकर्षक गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. अदानी समूह सध्या राज्यात लॉजिस्टिक, गॅस वितरण आणि कृषी-लॉजिस्टिक्स क्षेत्रात कार्यरत आहे. समूहाने या क्षेत्रांमध्ये 850 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यामुळं राज्यातील 3000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. अदानी समूहाने बिहारमधील आपली गुंतवणूक 10 पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


बिहार सरकारचा 38 कंपन्यांसोबत सामंजस्य करार


शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी बिहार सरकारने 26,429 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी 38 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. या कंपन्या कापड, चामडे, अन्न प्रक्रिया आणि सामान्य उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. ज्यामध्ये इंडियन ऑइलने 7386.15 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी, पटेल अॅग्री इंडस्ट्रीजने 5230 कोटी रुपयांच्या, इंडो-युरोपियन रिसर्च अँड हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडने 2000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी, अल्ट्राटेक सिमेंटने 1000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार केला आहे.


शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार लॉजिस्टिक पॉलिसी 2023 आणि राज्याच्या उद्योग विभागाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. मात्र, त्यांनी शिखर परिषदेला संबोधित केले नाही. शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी राज्याचे उद्योगमंत्री समीरकुमार महासेठ यांनी केंद्र सरकारकडे राज्यात विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याची मागणी केली होती. तसेच उद्योगांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासनही दिले होते.


महत्त्वाच्या बातम्या:


जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क गुजरातमध्ये, अदानी समुहाचा पुढाकार; 2 कोटींहून अधिक घरांना देणार वीज