नमस्कार, मिसेस अमृताजी देवेंद्र फडणवीस

तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. महाराष्ट्रात चाललेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय कोलाहलातून माझ्यासारख्या सामान्य मतदाराचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही आणि पोहोचलाच तरी तुमच्या सर्व सोशल अॕक्टिविटीजमधून तो आवाज ऐकायला तुम्हाला सवड मिळेल की नाही हे माहित नाही, तरीही उशिरा का होईना बोलायला हवंच. तर तुम्ही मध्यंतरी 'चल चल मुंबई संग चल' हे मुंबई रिव्हर अॅन्थम गायलात. त्या गाण्यात स्वतःसोबत आपल्या नवऱ्यालाही म्हणजे खुद्द महाराष्ट्राच्या मा.मुख्यमंत्र्यांनाही सामील करुन घेतले. तुम्ही बिग बी अमिताभसोबत नाचलात, गायलात. पंजाबी गाण्यावर ताल धरलात. पुण्यातील फॅशन इन्स्टिट्यूटच्या मॉडेल म्हणून न्यूयॉर्कमधील फॅशनवीकच्या रॕम्पवर कॅटवॉक करताना दिसलात. सोलापूर येथे भरलेल्या पतंजली योग समितीच्या महिला मेळाव्यात खासदार हेमा मालिनीसमवेत सामील झालात. तुम्ही पोलिस विकासनिधीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायलात. तुम्ही पैठणी महोत्सवातही आपली झलक दाखवली. एवढचं नाही तर 46व्या इंटरनॕशनल इंडिपेंडन्स डे (बांग्लादेश) च्या चिफ गेस्ट म्हणूनही हजेरी लावली. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून तुम्हाला मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं केलेलं आहे. सत्ता, पैसा, प्रसिद्धी यांचा वापर स्वतःचे कलागुण जोपासत सतत लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी कसा करता येऊ शकतो, याचा आदर्श वस्तुपाठच तुम्ही घालून दिला आहे.


नाहीतर आदर्श भारतीय नारी प्रकारातल्या कडक इस्त्रीची साडी नेसून चापून-चोपून अंगभर पदर घेतलेल्या, आषाढी कार्तिकीला विठ्ठल-रुख्माईच्या महापूजेस बसलेल्या नवऱ्याच्या हाताला हात लावून मम म्हणणाऱ्या किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या मुला-मुलीच्या शाही विवाहसोहळ्यात दागिण्यांनी मढून बायकांच्या गराड्यात रमणाऱ्या, शासनाच्या एखाद्या शानदार सांस्कृतिक कार्यक्रमात नवऱ्याच्या शेजारी दबून बसलेल्या. किंवा मग नवरा राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना त्याच्या माघारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची उठबस करणाऱ्या पुढाऱ्यांच्या बायकांचा महाराष्ट्रात अजिबात तोटा नाही. आजवर कोणत्याही राजकीय नेत्याची बायको तुमच्यासारखी खुलेपणाने वावरली नाहीय. पुढाऱ्यांच्या बायकांचं खानदानी घरंदाजपण जपत बसणं तुम्ही मोडून काढलेय. जिथे गायीला माता समजले जाते व स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते अशा संघ परिवाराची पार्श्वभूमी असताना, जे जगावर परंपरा लादतात त्यांच्या घरात राहून परंपरा मोडायला धमक लागते. माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनीही आधुनिकतेला विरोधच दर्शविला होता. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हिंदू कोड बिलाचा मसुदा मसुदा लिहिला होता. या पारंपरिक हिंदुत्ववादी विचारांच्या परिवारात (सासरे गंगाधररावही संघाशी संबंधितच) वाढलेल्या तुमच्या पतीने तुम्हाला पेहरावाचं, आपल्या आवडी-निवडी, कलागुण जोपासण्याचं (त्यावरच्या तुमच्या प्रभुत्वावर लोकांनी वारंवार प्रश्न उपस्थित करुनही) स्वातंत्र्य दिलेलं आहे. मुख्यमंत्र्याची बायको असूनही तुमच्या खुलेपणाने वावरणं आणि जगाचा विचार न करता आपल्या पत्नीच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणं यासाठी मा.मुख्यमंत्र्यांचेही आम्ही आभार मानतो. परंतु याच कारणामुळे इथल्या हिंदुत्ववादी पुरुषी अहंकाराला चांगलीच ठेस पोहोचली आहे. त्यांनी विकृतपणे अत्यंत हीन पातळीवर जाऊन तुमची सतत खिल्ली उडवलीय. फेसबुकवर पोस्टरुपी चर्चेची गुऱ्हाळं गाळली. महाष्ट्रातील पुढाऱ्याची बायको अशीही असू शकते हे इथल्या विचारांचं बोन्साय करु घेतलेल्या सनातनी वृत्तीच्या पुरुषांच्या अजिबातच पचनी पडलेलं नाही. त्यामुळे ते सतत ट्रोलरुपी करपट ढेकरं देत असतात, पण या टीकेला फार महत्त्व न देता तुम्ही संयमानेच सामोर गेलेला आहात हे वेळोवेळी जाणवले. तर असो.


आमच्या गावखेड्यातल्या बाया मात्र तुम्हाला टीव्हीवरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात बघून हरखून गेल्या आहेत. मुख्यमंत्र्याची बायको आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून असते. नाचते, गाते, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमांतून सतत टीव्हीवर झळकते. याचं त्यांना कोण अप्रूप वाटतं. कारण आमच्यात पुढाऱ्याच्या बायकांचा पदर डोक्यावरुन कधीच खाली पडत नाही. त्या एकतर शोभेच्या बाहुल्या म्हणून वावरतात किंवा मग 'रांधा वाढा उष्टी काढा' मध्येच दिवसभर गुंतलेल्या असतात. तुमचा नवरा मुख्यमंत्री असून आपल्या बायकोला सगळ्या गोष्टी करायला परवानगी देतोय. सगळे पुढारी, त्यांचे कार्यकर्ते असे वागले तर त्यांच्या बायकाही तुमच्यासारख्याच बऱ्याच पुढे जातील असं वाटतं. पारतंत्र्याच्या बेड्यांमध्ये जखडून ठेवलेल्या इथल्या प्रत्येक बाईला तुमच्या पती-पत्नींच्या खुल्या विचारांचं कौतुकच वाटतंय.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुठेही परदेशी जाताना आपल्या पत्नीला सोबत घेऊन जातात. आपल्याकडे ही प्रथा दिसत नाही, कारण आपल्याकडच्या नेत्याच्या बायकोला आजवर तो दर्जा मिळालेला नाही. पण मुख्यमंत्र्याची बायको असूनही तुमच्या खुलेपणाने वावरण्याचे आणि मुख्यमंत्र्यांनीही पत्नी म्हणून तुमचा वेळोवेळी सन्मान केल्याने राजकारणात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या  वा लहानमोठ्या पुढाऱ्यांच्या विचारसरणीत वेळाने का होईना नक्कीच सकारात्मक फरक पडू शकतो, कारण आपल्याकडे लोक बापासमोर मान झुकवत नाहीत, पण नेत्यापुढे साष्टांग दडवत घालतात. आज मुख्यमंत्री असणारी व्यक्ती जर इतक्या मोकळ्या विचारांची असेल तर ते विचार वरुन खालपर्यंत झिरपत जाऊ शकतात. ही अजून एक सकारात्मक बाब.


तुमच्या या मुक्त विचारसरणीचं आम्हाला मणभर कौतुक असलं तरी तुमच्या याच प्रतिमेमुळे तुमच्याकडून आमच्या काही अपेक्षाही आहेत. तुमच्याविषयी काही तक्रारीही आहेत. आमचं मुख्य गाऱ्हाणं हे आहे की, "तुम्ही सतत लाईमलाईटमध्ये असता. हाय प्रोफाईल लोकांमध्ये तुमची उठबस असते. ज्यांच्या प्राथमिक गरजा भागलेल्या आहेत अशाच लोकांसाठी तुम्ही प्रसिद्धी आणि सत्तेचा उपयोग केल्याचे (एखादा अपवाद वगळता) आमच्या निदर्शनास आले आहे. तुम्ही एखाद्या खेडेगावात येऊन तिथल्या स्त्रियांचे प्रश्न जाणून घेतल्याचे पाहण्यात आले नाही. तुम्ही ज्या भागात वाढला-घडला व आहात अशा शहरी उच्चभ्रू महिलांशी जशी तुमची बांधिलकी आहे, तशीच महाराष्ट्राचा सत्तर टक्के भाग असणाऱ्या खेड्यांशी, तिथल्या कष्टकरी स्त्रियांशी नाहीय का? गेल्या महिन्यात नाशिकमधून किसान लाँग मार्च निघाला. मुंबईत येईपर्यंत त्यातील महिलांचे झालेले हाल कुणीही विसरु शकलं नाही. पक्षीय विचारधारेच्या पलीकडे जाऊन एक बाई म्हणून तुम्हाला आदिवासी कष्टकरी स्त्रियांविषयी काहीच कसे बोलावेसे वाटले नाही? की व्यक्त होण्यामध्ये किंवा कृतीमध्ये तुम्ही सिलेक्टिवच असणार आहात?


तुमच्याकडे असलेल्या सत्तेचा, प्रसिद्धीचा वापर महाराष्ट्रातील या कष्टकरी स्त्रियांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी होणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, आरोग्य, सुरक्षितता यासंबंधी गावखेड्यांमधील स्त्रियांचे खूप प्रश्न आहेत. तुमच्यासारख्या सत्ता, प्रसिद्धी, संधी, पाठिंबा यांचं पाठबळ असणाऱ्या स्त्रीने अशा प्रश्नांवर काम केलं तर कष्टकरी स्त्रियांचे 'अच्छे दिन' यायला फार वेळ लागणार नाही. मग तुमच्याकडे याच कौतुकाच्या नजरेने बघणाऱ्या या आयाबाया आजन्म तुमच्या ऋणात राहतील. कसंय ना की हेमामालिनीसोबत स्टेजवर बसायला कुणालाही मजाच येईल, पण महाराष्ट्राच्या मा.मुख्यमंत्र्यांची कृतिशील पत्नी म्हणून मातीत मळलेल्या बायांसाठी काही करावं ही तुम्हाला तुमची नैतिक जबाबदारी वाटत नाही का? पारंपरिक रेहनसेहनला फाट्यावर मारत तुम्ही केलेला विद्रोह आमच्या कौतुकाचाच विषय ठरलेला आहे. पण फाटक्या, विटक्या साडीमध्ये दिवस काढणाऱ्या, स्वतःच्या न्यायहक्कांसाठी भांडणाऱ्या तुमच्या भगिनींसाठी ग्रासरुटला जाऊन तुम्हाला काहीच करावेसे वाटत नाही का?


तर मा.अमृताजी आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही रॅम्पवॉक करा, कॅटवॉक करा. कोणत्याही चौकटी मोडा. त्याचं आम्हाला कौतुकच आहे. पण त्याबरोबरच गावखेड्यातील, वाड्यावस्त्यांवरील काबाडकष्ट करणाऱ्या आयाबायांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी एखादा व्हिलेजवॉक करुन ठोस काही करता आलं तर जरुर पाहा.