असं म्हणतात या पृथ्वी वर कित्येक मोठमोठी संकटं आजवर आली आणि मनुष्याने ती तंत्रज्ञानाच्या मदतीने परतवून लावली. भूतलावरील बदलेले रूप या गोष्टी आपण वाचत आलो, ऐकत आलो आहोत. सांगायची गोष्ट अशी की 13 मार्च दिवस तसा नॉर्मल सुरळीत चाललेला होता. HR महोदयांच्या मेल कडे नेहमीप्रमाणे अगदीच महत्वाचं असं काही असेल नसेल म्हणून माझं तरी लक्ष नव्हते बाकीच्यांचे माहीत नाही.


वेब टीमचे बॉस, त्यांच्या नेहमीच्या शैलीत, एबीपीचं आयकार्ड एका हाताने गोल-गोल फिरवत, खांद्यावर त्यांची छोटी बॅग आणि दुसऱ्या हातातल्या मोबाईलमध्ये लक्ष देत नेहमी येतात आणि जर काहीतरी महत्वाचं असेल तर न्यूजरूममध्ये आल्या आल्या थेट आमच्या डेस्ककडे येतात आणि ठराविक सूचनाही सांगून जातात. हे सारं नेहमी सारखंच असेल अश्याच भावनेने मी ही त्यांच्याकडे पाहिले आणि एक क्षण थांबलो काय सांगतात हे ऐकायला.

"आपल्या पैकी किती मंडळी ना, घरून काम करता येईल; किंवा सर्वांकडे लॅपटॉप इंटरनेट व्यवस्था आहे का?" असा धाडकन प्रश्न विचारला सोबतच सर्व सहकाऱ्यांना ही विचारा असेही सांगितले. अर्थात मी सुद्धा गोंधळात होतोच की यामागे कारण काय असावं? तेवढ्यातच सर म्हणाले की HR च्या मेल नुसार 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण वर्क फ्रॉम होम करायच्या शक्यता तपासून पाहूया आणि जर व्यवस्था होत असेल तर लगेचच अमलबजावणी करू' तसेही मला एबीपी माझाला जॉईन होऊन अवघे काही महिनेच पूर्ण होत होते. एबीपी वेब टीमचं कामं तसं डिजिटलच. इथली सगळी कामं जेमतेमच असलेली अशी वेबटीम मंडळी करते आणि संपूर्ण मराठी लोकांच्या प्रेमाची पावती देखील घेते. आणि नुकतंच कोरोना विषयी काही तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सुद्धा प्रेक्षकांच्या साठी घेऊन आलो होतो. तर सांगायचा मुद्दा असा की फटाफट सगळ्यांनी तयारी दर्शवली. सरांनी दुपार सत्रातील सहकाऱ्यांना घरूनच कामं करायला सांगितली आणि सर्व कामं होत आहेत पाहिले. लगेचच घरून काम करायचे ठरले.

मुंबईमधून काही दिवस घरी जायला मिळेल यानिमित्त काही दिवस हा आनंद होता. पण पुढं काहीतरी वेगळं लिहून ठेवलंय याची पूर्वकल्पना जराशी देखील नव्हती, दुसऱ्या दिवशी माझा सहकारी त्याच्या पूर्वनियोजित ठरलेल्या मुंबई पुणे दौऱ्यामध्ये सोबत आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. बिलकुलही भान कसलं ते नव्हतं पुण्यात येईपर्यंत इकडे दोन आकडी रुग्ण तीन आकडी पर्यंत मजल गाठू लागले. कोरोना भारतात हा हा म्हणता पाय पसरू लागला. वर्क फ्रॉम फोमचे ग्रुप तयार झाले. एडिटर्सपासून सगळी मंडळी एकत्रितपणे सहकार्याने घरातून मोठ्या जोमाने कामंही करू लागली. पूर्णतः एक वेगळा अनुभव आम्ही सर्व घेत होतो, त्यानंतर जनता कर्फ्यु येऊन धडकला ते मग महाराष्ट्र बंद थेट 21 दिवसांचं लॉकडाऊन.

या सगळ्यात घरी आल्याचा आनंद केव्हाच विसर्जित झालेला. महाराष्ट्र बंद होईल आज महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थाचा आकडा 325 पार होईल याची कसलीही कल्पना नव्हती. माध्यमाद्वारे आज सर्वांना घरी थांबायला केलेली रिक्वेस्ट आणि प्रत्येकाने त्याकडे गांभीर्याने घेऊन पाळलेली पथ्ये, सरकारी यंत्रणा पासून मीडिया माध्यमातून होणारं मार्गदर्शन सगळ्यांचंच लक्ष एक नवी उमेद कोरोनाच्या लढ्यात देईल किंबहुना जरी हा संसर्ग पसरतोय तरी एकीकडं ओझोन चा थर ही हळूहळू भरू लागलाय थोडंस पर्यावरण शांत झालंय. न्यूजरूममध्ये सगळ्या मंडळीसोबतचं ते वातावरण सोबतचा लंच, चहा, सिनियर्सच्या सूचना ते प्रत्येक आठवड्यातला माझा कट्टा, हे सारं पुन्हा हवंय.

आपल्या सर्वांच्याही कुठेतरी एक भावनिक सांगड आपापल्या क्षेत्रात, ऑफिसवर, उद्योगातील कामाची ओढ असो वा सहकाऱ्यांचा लळा, सोबतच कधी त्यांच्यासोबत होणारी चिडचिड देखील मिस करत असालच तुम्हीही. वर्क फ्रॉम होमची बसलेली जम काही तांत्रिक गोष्टींची अडचण सोडता, कुठेही न बाहेर पडता एका ठिकाणी बसून कामात वेळ कसा निघून जातो कळत नाही. मात्र, आज आठवा दिवस आहे, रुग्ण चार अक्षरी आकडे पार करत आहेत, सारं काही भयावह आहे. आशा करूया आपल्या सोबतच संपुर्ण पृथ्वीवर आलेलं हे संकट, या युद्धाला आपण नक्की जिंकू असा विश्वास आहे, नव्यानं सुरू करूया!