Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत (Mumbai News) आणखी एक ठाकरे विधानसभा निवडणूक (Vidhan Lok Sabha Elections) लढवणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. हे आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र... अमित ठाकरे (Amit Thackeray)... सोमवारी मनसे (MNS) नेते आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईतील (Mumbai Politics) राजगड कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मनसे नेत्यांनी अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची गळ घातली. त्याला अमित ठाकरे यांनीसुद्धा तयारी दर्शवली, असा दावा काहीजण करत आहेत. अमित ठाकरे काय करणार? हे गुलदस्त्यात असलं, तरी त्यांनी ठरवलंच तर ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? यावर बराच खल सुरूसुद्धा झाला आहे. 


मुंबईतील माहीम, भांडुप, मागाठणे, दिंडोशी,कलिना, आणि चांदीवली या मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी तिथल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. काही उत्साही मनसैनिकांनी भांडूप आणि मागाठणे या मुंबईतल्या दोन विधानसभा मतदारसंघांत अमित ठाकरेंचे बॅनर सुद्धा लावले आहेत. यातल्या तीन मतदारसंघात 2009 साली मनसेचे आमदार निवडूनही आले होते. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदार संघ शोधणं हे सोपं काम नसेल. त्यात राज ठाकरेंनी  ठरवल्याप्रमाणे महायुतीसोबत न जाता मनसेनं स्वबळावर ही विधानसभा निवडणूक लढवलीच तर तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढतीत अमित ठाकरेंचं पदार्पण आणखी कठीण होणार आहे.


अमित ठाकरेंनी निवडणूक लढवली तर मनसैनिकांमध्ये उत्साह संचारेल, हे नक्की असलं तरी तो मार्ग खडतर आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. अमित ठाकरेंसाठी ज्या भांडूप पश्चिम मतदारसंघाची चर्चा होतेय, तिथे 2009 साली राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली होती. मनसेचे शिशिर शिंदे 73 हजार मतं घेऊन 30 हजार मतांनी निवडून आले होते. त्यावेळी संजय राऊत यांचे बंधू आणि आत्ताचे विक्रोळीचे दोन टर्मचे आमदार सुनील राऊत 34 हजार मतं घेत तिसऱ्या स्थानावर राहिले होते. 


भांडूप पश्चिममध्ये 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत मनसेची हक्काची 40-42 हजार मतं आहेत हे दिसून आलंय. त्याला भाजपची थोडीफार साथ मिळाली तर 2009 सारखी कामगिरी करता येईल असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांचा वाटत असेल. भांडूप पश्चिम प्रमाणेच माहीम मतदारसंघाकडे सुद्धा मनसैनिकांचा ओढा असल्याचं सांगितलं जातंय. 1990 पासून माहीम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. फक्त 2009 साली तिहेरी लढतीत 48 हजार मतं घेत तिथे मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली होती. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले सदा सरवणकर 39 हजार मतं घेत दुसऱ्या तर शिवसेनेचे 'भाऊजी' आदेश बांदेकर 36 हजार मतं घेत तिसऱ्या स्थानावर होते. 


भांडुपप्रमाणेच माहिममध्ये सुद्धा गेल्या दोन्ही निवडणुकीत मनसेनं 40-42 हजार हक्काची मतं घेतली होती. मात्र इथे एक वेगळाच पेच आहे. गेली दोन टर्म तिथे शिवसेनेचे सदा सरवणकर आमदार आहेत. असा मतदार संघ शिंदे किंवा सरवणकर सहजासहजी सोडतील याची शक्यता कमीच आहे. आणि विजयाची हमी असल्याशिवाय राज ठाकरे मुलाला मैदानात उतरवतील याची शक्यता त्याहून कमी आहे. 


मुंबईत पंधरा मतदार संघामध्ये मनसेची चांगली ताकद असल्याचं सांगितलं जातंय. ती ताकद अमित ठाकरे निवडून आणण्या इतपत असेल याबाबत शंका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आदित्यसाठी जसा वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ निवडला. तिथल्या सचिन अहिर सारख्या विरोधकाला, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला आपलंसं केलं. म्हणजे काय तर थेट शिवसेनेत घेऊनच टाकलं. नंतर दोनतीन वर्षात विधान परिषदेवर घेत त्यांचं पुनर्वसनसुद्धा केलं. तिथे सुनील शिंदेसारखा हाडाचा शिवसैनिक 2014 साली आमदार झाला होता, त्यांची समजूत काढावी लागली होती, त्यांनी आदित्यसाठी जागा सोडल्याचं बक्षीस म्हणून नंतर त्यांना स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर घ्यावं लागलं होते. वरळीतून आदित्यला उतरवताना त्यावेळच्या भाजपसारख्या मित्रपक्षालाही उद्धव ठाकरेंनी विश्वासात घेतलं होतं. तसंच काहीतरी राज ठाकरे यांना अमित ठाकरेंसाठी करावं लागेल. सध्या राज ठाकरेंनी एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यावर कायम राहुन अमितचा मार्ग प्रशस्त करणं हे मोठं आव्हान राज ठाकरेंसाठी असणार आहे.