आयुष्याचा रहाटगाडा हाकताना पैशांची गरज प्रत्येकाला भासते. कोणी पैसा कमवण्यासाठी नोकरी करतं, कोणी वेगळ्या वाटेवर जात उद्योगधंदा करतो तर कोणी गुंतवणूक. पण काही न करता भरपूर पैसे कमावण्याची सुप्त इच्छा आपल्यातल्या बहुतेकांना असते. त्यामुळे मग कमी वेळात भरपूर पैसे कमवून देण्याचं आमिष कोणी दाखवलं की आपण लगेच बळी पडतो. अर्थात पैशांची गरज प्रत्येकाला असते, कधी कधी तो कमावण्यासाठी रिस्क सुद्धा घ्यावी लागते. पण रिस्क कुठे आणि किती घ्यावी हे समजण्यासाठी गरजेची आहे ती आर्थिक साक्षरता. शेवटी नीड आणि ग्रीड मधला फरक आपण समजून घ्यायला हवा. श्रीमंतीच्या शॉर्टकटपायी अनेक जण कुठलीही खातरजमा न करता कोण्याच्याही हातात आपली लाखमोलाची कमाई देतात. आणि उरलं सुरलं पण गमावून बसतात. सध्या शेअर मार्केट फार पेव फुटलंय. शेअर मार्केटकडे बघण्याचा मराठी माणसाचा दृष्टीकोण बरीच वर्ष नकारात्मक होता. तो आता कुठे बदलतोय.  बऱ्याचदा तुम्ही अमुक शेअरमध्ये अमुक वेळी इतके गुंतवले असते तर अमुक वर्षांनी त्याचे हजारपट झाले असते अश्या बऱ्याच प्रोव्हेकेटिव्ह बाबी बातम्या काही माध्यमं बाळबोधपणे तुमच्यापर्यंत पोहचवत असतात. पण लाखाचे हजार झालेले सहसा कोणी सांगत नाही.
  

शेअर मार्केटमध्ये पैसे लगेच दुप्पट करणं शक्य आहे का?


तर मुद्दा असा आहे की  शेअर मार्केट हा काही सट्टा नाहीये. योग्य अभ्यास, विश्लेषण, निष्कर्ष आणि टायमिंग साधून तुम्ही स्वतः चांगला परतावा मिळवू शकता. मला स्वतःला यातलं फारस काही माहीत नसताना काही स्टोक्समुळे माझे पैसे दुप्पट तिप्पट झालेयत तसच जुन्या काही चुकांमुळे सगळे पैसे गेले पण आहेत. अर्थात जे पैसे अख्खे गेले तरी माझ्या आयुष्यावर त्याचा फार परिणाम होणार नाही एवढेच पैसे मी गुंतवले होते त्यामुळे नफा पण मर्यादित झाला आणि तोटाही.  पण एक गोष्ट सांगतो की कोणी जर म्हणत असेल की मी महिन्याला 10, 15, 28 टक्के देतो तर हे शक्यच नाहीये. प्रचंड रिस्क घेऊन ऑप्शन्स इन्ट्राडे मध्ये तुम्ही ट्रेड केला तर कदाचित  फायदा होऊ शकतो पण सामान्य गुंतवनुकदाराने त्यापासून दूरच राहावं. कारण गुंतवलेले सगळे पैसे क्षणात मातीमोल सुद्धा होतात.  आर्थिक बाबींच्या जाणकार आणि हर्षद मेहताचा १९९२ चा घोटाळा ज्यांनी उघडकीस आणला त्या  सुचेता दलाल यांना शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट होऊ शकतात का याबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः अभ्यास करुन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवू शकता पण दुसरी कोणी व्यक्ती जर तुमचे पैसे घेऊन असं आमिष दाखवत असेल तर लगेच तुम्हाला संशय यायला हवा. कारण शेअर मार्केटमध्ये कोणीही इतक्या परताव्याची गॅरंटी देत नाही आणि नोंदणीकृत गुंतवणुक सल्लागार मुळात तुम्हाला सल्ला देतो, तुमचे पैसे घेऊन ते गुंतवण्याच्या भानगडीत ते कधीही पडणार नाही'  

परताव्याच्या आमिषापाई लुटण्याची पद्धत नेमकी कशी असते?


तुमच्या  झटपट श्रीमंत होण्याच्या सुप्त इच्छेचा फायदा घेणारे सध्या बाजारात बरेच आहे. भुरळ पाडण्यासाठी कोणी चीटफंडचा आधार घेतं तर कुणी शेअर मार्केटचा.   बार्शीच्या  विशाल फटेने शेअर मार्केटच्या नावाचा वापर करत लोकांना दाम दुपटीच अमिष दाखवलं.  10 लाख रुपये गुंतवल्यावर वर्षभरात ६ कोटी रुपये रिटर्न देणार अस फटेने सांगितलं. यात गुंतवणुकदारांना फसवण्यासाठी अशा आरोपींची एक मोडस ऑपरेंडी असते. आधी ते ठराविक रकमेवर परतावा देण्याची बतावणी करतात. काही दिवस, महिने काही जणांना ते गुंतवलेल्या रकमेवर परतावाही देतात. मग गुंतवल्यावर हा व्यक्ती खरच परतावा देतो असा विश्वास बसला की आधी ज्यांनी गुंतवले ते आणखी रक्कम यात गुंतवतात आणि स्वतःच्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही यात गुंतवायला सांगतात. मग मोठ्ठी रक्कम जमा झाली की हे 'फटे' पळ काढतात.  त्यानंतर मुळात आपली फसवणूक झालीये हे कळायलाच गुंतवणुकदारांना वेळ लागतो. अशीच पद्धत या फटेची होती.  पण  या आमिषाला बळी पडून अनेकांनी कर्ज काढून, घर दागिने गहाण ठेऊन, जमीन, घर विकून, पर्सनल लोन काढून पैसे उचलले आणि ते यात टाकले.. मुळात पहिली गोष्ट म्हणजे ज्याला गुंतवणुकीची जाण आहे तो कधीच कर्ज काढून गुंतवायला सांगत नाही मुळात गुंतवणुकीचा हा बेसिक रुल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती पैसे दुप्पट करू शकते ती स्वतःचेच पैसे गुंतवून भांडवल वाढवत राहील . त्याच्याकडेच इतके पैसे असणार की त्याला दुसऱ्यांच्या गुंतवणुकीची गरजच भासणार नाही.हा विचार पैसे टाकणाऱयांच्या डोक्यात आला कसा नाही याची मला कमाल वाटते. पैश्यांच्या हव्यासापायी इतकं कस कोणी आंधळं होऊ शकत. मुळात हे 28 टक्के रिटर्न आणि दामदुपतीच आमिष मुळातच फसवं आहे याची जाणीव सुद्धा यांना झाली नाही आणि सगळे पैसे गमावून बसले.  बार्शीतल्या अनेक गुंतवणूकदारांपैकी कोणी ४८ लाख, ३४ लाख ,  ५० लाख , ९ लाख अशी कोट्यवधींची रक्कम डोळे लावून त्या फटेला दिली.

 

अल्गो ट्रेडिंगच्या नावाने गंडा


आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही अधिकृत ब्रोकर तुमचे पैसे घेऊन ते गुंतवत नाही तर तुमचेच पैसे तुम्हाला फक्त योग्य ठिकाणी गुंतवायला सांगतो. या केस मध्ये हा फटे गुंतवनुक सल्लागार म्हणून सेबी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत आहे का हे सुद्धा कोणाला तपासावं वाटल नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फटेने  ग्रे मार्केट आणि अल्गो ट्रेडिंग मधून पैसे कमवत असल्याचं लोकांना सांगितलं.    

 

याबद्दल किती लोकांनी माहिती घेतली? ग्रे मार्केट आणि अल्गो ट्रेडिंगसाठी कुठली रेगुलेटरी ऑथोरिटीच नाहीये. मुळात ग्रे मार्केट मधल्या आयपीओच्या खरेदीवर सुद्धा नुकसान होतं. आता ग्रे मार्केट आणि अल्गो ट्रेडिंग काय आहे याबद्दल पुन्हा कधी सांगेन पण आपला मेहनतीचा लाखमोलाचा पैसा थोड्याश्या हव्यासापायी कोणालाही देताना हजार वेळा विचार करा. अशा फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी पकडल्या जरी गेला तरी पैसे कधीही परत मिळत नाही अशी माहिती सुचेता दलाल यांनी दिली. 

 

लॉकडाऊनच्या काळात अनेकजण शेअर मार्केटकडे वळले. गेल्या 2 वर्षात मार्केटने प्रचंड परतावा दिलाय. पण परिस्थिती नेहमी अशी नसते.   तरीही  चांगल्या परताव्यासाठी तुम्ही स्वतः शेअर मार्केटची कास धरायला हरकत नाही पण तीही अभ्यास करुन माहिती घेतल्यानंतर. राहीला प्रश्न गुंतवणुकीचा, तर नेहमी तुमच्या बचतीचा काहीच भाग त्यात गुंतवा, कर्ज काढून नव्हे आणि दुसरं कोणी जर शेअर मार्केटचं नाव घेऊन पैसे मागत असेल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर बाजारातले फसवे 'फटे' तुमच्या पैशांनाही फाटे फोडल्याशिवाय राहणार नाही.