स्वर्ग असेल तर तो यापेक्षा वेगळा नसेल, स्वर्ग ही फक्त कल्पना असेल तर ती यापेक्षा वेगळी नसेल. रंगछटांचा असा विलक्षण अविष्कार की इंद्रधनूही अवाक होऊन हे अद्भूत दृश्य पाहात असावा. निसर्गदेवतेच्या शृंगाराचं हे अनोखं तेज स्वर्ग नसेल तर काय आहे. मैलोनमैल पसरलेल्या शीतल पारदर्शी जलाच्या अविचल लहरी. ध्यानस्त योगींसारखे चहूबाजूंनी उभे असलेले पहाड. कधी ढगांची पडछाया तर कुठे दूर पहाडाच्या टोकावर पडणारे कवडसे. हिमालयाच्या शीतलहरींचा आल्हाददायी पण झोंबणारा वारा. नजरेत सामावणार नाही इतकं विस्तीर्ण निळंशार जलपात्र जसं सावळ्या कृष्णाचं प्रतिबिंब. निळं म्हणजे इतकं की, थेट आकाशाला प्रश्न विचारून चिडवत असावं, हे आभाळा सांग मी जास्त निळा की तू? आत्ममग्न होण्यास याहून उत्तम ठिकाण कोणतं असू शकतं. या विसावू क्षणभर पँगाँगच्या सरोवराकाठी..


मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, या म्हणीचा मतीतार्थ असा आहे की, सर्वोत्तम प्राप्तीसाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. त्यानंतर ध्येयपूर्तीचा क्षण स्वर्गासमान असतो. पँगाँग सरोवराच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. पँगाँगच्या डोहात आनंदाचे तरंग अनुभण्यासाठी प्रवासही खडतर आहे. लेहपासून 225 किमी अंतरावर भारताच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्यासाठी पहाडांचा रोष ओढावून घेत प्रवास करावा लागतो. समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवर वसलेल्या जगातल्या सर्वात उंच सरोवराकाठी पोहोचायचं असेल तर निसर्गाचा लहरीपणाही तेवढाच सहन करावा लागतो. लेह ते पँगाँग रस्ता थोडा चांगला, थोडा वाईट तर कुठे अत्यंत वाईट आणि खडतर. त्यामुळे सव्वा दोनशे किमीच्या अंतरासाठी किमान पाच तासांचा प्रवास करावाच लागतो. त्यात कुठे दरड कोसळली, पहाडांमध्ये ट्रॅफिक लागलं तर मग विसराच. त्यामुळे भल्या पहाटे सुरू झालेला आमचा प्रवास दुपारी दोन वाजताच्या आसपास पँगाँग सरोवराजवळ येऊन थांबला. रस्त्यात चान्गला खिंडीच्या टोकावर थंडीनं अगदी जीवच काढला. अर्थात साडे सतरा हजार फूट उंचीवर चांगला पासची थंडी मुंबईत राहणाऱ्यांना सोसवणारी नव्हती. निसर्ग आपल्या अटी शर्तींवर चालत असतो. तिथे आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यावंच लागतं. तरंच तुम्ही त्याच्याशी एकरुप होऊ शकता. इथले डोंगर, खळाळणारे झरे हे स्वप्नवत वाटतात. असं वाटतं आपण एखाद्या अनाम गूढ प्रदेशावर जात आहोत की काय. प्रवास जेवढा देखणा तेवढाच खडतरही. पण पहिल्यांदाच जेव्हा पँगाँगची निळाई तुमच्या नजरेस पडते. तो क्षण... आहाहा.!!! त्यालाच मी मघाशी स्वर्ग म्हणालो होतो.


त्सो म्हणजे तळं, तलाव. खरंतर हा तिबेटी शब्द. पँगाँग त्सो हे नाव जरी जगमान्य असलं तरी लदाखी लोक या सरोवराला स्पंगोंग म्हणतात. आसपासच्या गावात पँगाँग उच्चारतात. पौराणिक कथांनुसार यक्ष राजा कुबेराच्या राज्याची राजधानी अलकापुरी याच सरोवराच्या आसपास होती. रामायण महाभारतात याचे पुसटसे उल्लेख आहेत, पण ठोस माहिती सांगता येणार नाही. तिबेटी भाषेत त्सो किंवा इंग्रजीत lake जरी म्हटलं जात असलं तरी मराठीत तळं किंवा तलाव म्हणणं हा या सरोवराचा अपमानच वाटतो. अहो, 134 किलोमीटर लांब आणि 604 वर्ग किलोमीटर परिसर असलेला पँगाँग हा एखाद्या समुद्रापेक्षा कमी नाही. शिवाय समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवरचं हे असं दिव्य सरोवर म्हणजे प्रकृतीचा अनोखा अविष्कारच म्हणावा. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा या सरोवरचं काचेसमान नितळ पाणी मी प्यायलो तर ते चक्क खारट होतं. निसर्गाचा हा चमत्कार कुतुहल वाढवणारा होता. नंतर त्याचं कारणही कळलं. पहाडांवर साचलेला बर्फ वितळून ते स्वच्छ पाणी सरोवरला मिळतं. सरोवरातलं पाणी कोणत्याही नदी वा समुद्राला जाऊन मिळत नाही. पाण्याला ड्रेनेज सिस्टिम नसल्यानं म्हणजे बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नसल्यानं ते खारट बनतं. पाणी खारट असल्यानं या तलावात ना मासे आहेत, ना कुठले जीवजंतू ना वनस्पती. प्रवासी पक्षांच्या प्रजननासाठी मात्र हे उत्तम ठिकाण आहे. पँगाँगच्या पात्रात अनेक खजिनं असल्याचंही बोललं जातं. असं म्हणतात की, काही शतकांपूर्वी पँगाँग सरोवर सिंधू नदीला जोडलेलं होतं. पण भौगोलिक बदलांमुळे नदी आणि सरोवराचं पात्र वेगवेगळं झालं.  


दोन घटका सरोवराच्या काठावर बसल्यानंतर तुम्हाला रंगाविष्काराचा जादूई अनुभव येऊ लागतो. निळं दिसणारं हे पाणी दिवसभरात अनेकदा आपल्या रंगछटा पसरतं. कधी गर्द निळं, कधी आकाशी, कधी हिरवा रंग, तर कधी मोतिया रंगाची उधळण. मी ऐकलंय की कधी कधी केशरी रंगांच्या छटाही या पाण्यावर स्पष्ट दिसतात. सरोवराचं पाणी आणि सूर्यप्रकाशातल्या प्रेमाचा हा सगळा मामला आहे. अर्थात दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी ही रंगपंचमी या सरोवरात साजरी होत असते. त्यासाठी पुन्हा एकदा फुरसतीनं यावं लागेल. एप्रिल ते ऑक्टोबर पँगाँगचं पाणी असं शांत शीतल असतं. नंतर हिवाळ्यात पँगाँग सरोवर पूर्णतः गोठून जातं. गोठतं म्हणजे इतकं कठोर की, त्यावर चारचारी गाडी चालवली जाईल. याच गोठलेल्या पात्रात विविध खेळ खेळले जातात. बर्फाच्या लादीवर पोलोचा खेळ विशेष रंगतदार होतो असं म्हणतात. डोगरा सेनापती जोरावर सिंग यांनी लडाखवर विजय मिळवल्यानंतर तिबेटकडे कूच केलं. तेव्हा याच बर्फाळ सरोवरच्या पात्रात घोड्यांचा सराव केला होता.


सौंदर्याला शाप असतो असं म्हणतात. पँगाँगवर शेजारच्या चीनची वक्रदृष्टी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. 134 किमी पैकी भारतात फक्त 40 टक्के भाग आहे. उरलेला 10 टक्के भाग चीन तर पन्नास टक्के भाग तिबेटकडे होता. मात्र चीनसारख्या असुरी प्रवृत्तीच्या राष्ट्रानं तिबेट गिळंकृत केलाय. आता त्याला तसाच भारताचा भाग हवा आहे. त्यासाठी कायम भारतीय हद्दीत येऊन चीनी सैनिक हैदोस घालण्याचा प्रयत्न करतात. आजच्या घडीला चीन हा भारताच्या 38 हजार स्क्वेअर किमी भाग अडवून बसला आहे, ज्याला आपण अक्साई चीन म्हणतो. त्यासोबतच शक्सगम व्हॅलीचा पाच हजार स्क्वे किमीचा भागही भारताचाच होता. त्यावर चीनी सैनिकांनी कब्जा मिळवलाय. 1962 च्या भारत-चीन युद्धाचं कारण अक्साई चीनचा बळकावलेला भागच होता. भारत आणि चीनची सीमा जमिनीसोबतच पँगाँग सरोवरच्या मधून जाते. सरोवराच्या पात्रात सीमारेषा असल्यानं चीनी सैनिकांनी सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही भागांवर हल्ला केला. त्यावेळी दक्षिण भागातून घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या तीन हजार चीनी सैनिकांना रेझांगला पासवर मेजर शैतान सिंग यांनी रोखून धरलं होतं. रेझांगलाच्या खिंडीत मेजर शैतान सिंग यांच्या रुपात साक्षात बाजीप्रभू देशपांडेच अवतरले होते. सरोवराच्या पलिकडच्या बाजूवर धान सिंग थापा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. आज त्या चेकपोस्टला मेजर धान सिंग थापा यांचं नाव देण्यात आलंय. अतुलनिय पराक्रम गाजवणाऱ्या भारतमातेच्या या सुपुत्रांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. अशा शूर वीरांमुळेच आज आपल्या देशाच्या सीमा भक्कम आहेत.


1999 साली लडाखच्या उत्तरेकडच्या सीमेवर कारगिलमध्ये युद्धाची ठिणगी पडली. त्यावेळी पँगाँग सरोवर परिसरात असलेल्या सैनिकांच्या अनेक तुकड्या लढण्यासाठी कारगिलकडे गेल्या. या संधीचा फायदा घेत चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीत पाच किमीपर्यंतचा भाग बळकावला. आतापर्यत चीनी सैनिकांनी पँगाँगपर्यंत वाहनांसाठी रोड तयार केलाय. पँगाँग पात्रात भारतीय हद्दीत पूल बांधण्याचा असफल प्रयत्नही केला जातो. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या युद्धात 20 भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवान आजही चीनच्या महत्वाकांक्षांना सुरुंग लावण्यासाठी सज्ज आहे.


एकीकडे सौंदर्याचा साज लेवून बसलेल्या या पँगाँगच्या सरोवराचे पहारेकरी आपले सैनिक आहेत. या निळ्याशार जलवलयांवर आपल्या शहीदांच्या रक्ताचा तवंग आहे हे आपण विसरता कामा नये. इथल्या वाळूवर सैनिकांच्या पराक्रमाचा आणि प्रत्येक पहाडावर बलिदानाचा इतिहास लिहिला गेला आहे. शत्रू दारात येऊन उभा आहे. दिवसरात्र प्रत्येक क्षण वैऱ्याचा असताना डोळ्यात तेल घालून लढणाऱ्या सैनिकांच्या आठवणीत या मनोहारी सरोवराच्या काठी मन काही काळ उदास होतं. पँगाँग सरोवर बघण्यासाठी प्रत्येक भारतीय व्यक्तीनं यायला हवं. थ्री इडिएटमध्ये आमीर खान आणि करीनाचा सीन कुठे चित्रित झाला हे बघण्यासाठी नव्हे, तर निसर्गाच्या या अगम्य चक्रात अत्यंत खडतर परिस्थितीत आपले सैनिक कसे लढत असतील हे बघण्यासाठी या. जिथल्या वातावरणात आपण नीट श्वासही घेऊ शकत नाही तिथे सैनिक वर्षानुवर्षे आपल्या परिवारापासून अलिप्त राहून या जलसमरात आहुती देत आहेत ते जाणून घ्या. लडाखचा हिमालय, काराकोरमची पर्वतरांग, पँगाँगचे सौंदर्य हे भारतमातेच्या पदराचे रंग प्रत्येकानं बघावे. आईच्या पदरात हात घालणाऱ्या शत्रूचे हात छाटणाऱ्या आपल्या सैनिकांना एक कडक सॅल्यूट करण्यासाठी पँगाँगच्या सरोवरावर या.


(या आधीचे पहिले चार भाग वाचण्यासाठी यावर क्लिक करा).


BLOG : जु'लेह' लडाख (भाग 1)


BLOG : जु’लेह’ लडाख (भाग 2)


BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 3 )


BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 4 )