आपल्याकडे ना सर्रासपणे कोणत्याही लग्न कार्यात मनसोक्त टच्च पोटभर जेवून, ढेकर देत लाल चेरी लावलेलं एक पान खाऊन दुसरं पान हातात घेऊन जेवण कसं चांगलं नव्हतं, यावर आहेर म्हणून 21 रुपयांचं बंद पाकीट देऊन लग्न कार्यातली मापं, उनी-धुनी पारावर महिनाभर चर्चा केल्या जातात. शिवाय मापं काढणाऱ्यांच्या घरी त्या दिवशी चूल सुद्धा पेटली नसते. घरातल्या सगळ्यांना फुकटचं जेवून या म्हणून तंबी दिलेली असते.


असाच काहीसा प्रकार सिनेमे बॉयकॉट करणाऱ्यांचा आहे. चित्रपट मोबाईलवर, टेलिग्रामवर मिळाला तर जे जे मिळेल ते ते पाहणारी मंडळी शे-पाचशे रुपयांचं तिकीट न काढता ट्रोलिंग करायला मोकळी असतात.  मात्र हीच मंडळी चावट सिनेमे दुप्पट पैसे खर्च करून चोरपावलांनी पाहून येतात. त्याबद्दल ते तोंडातून ब्र देखील काढत नाहीत. आता, हे सगळं लिहायला कारण म्हणजे प्रेक्षकांच्या सॉरी...सॉरी हिंदुत्ववादी मतदारांच्या मनातला 'रावण' ठरलाय...


मी स्वतः VFX, Animation, Graphics नंतर Fine Art's केलंय. 3D Modeling मध्ये specialization, बोटावर मोजता येईल एवढ्या चित्रपटात काम केलंय. त्यात मग पोस्ट प्रॉडक्शन मध्ये VFX रोटो आर्टिस्ट असो, बॅकग्राऊंड डिजाईन असो वा अगदी कलाकार असो किंवा पडेल ते काम आवडीने करणं असो या सगळ्याचा भाग असताना एखादी कलाकृती साकार होते आणि काडीचा संबंध नसलेली रिकामटेकडी मंडळी फुकटच्या सोशल मीडियावर धर्म, जात, राजकारण, व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या अकलेचे तारे तोडताना हल्ली दिसतात. मित्रांनो VFX चा दर्जा आणि त्याची मेहनत या सगळ्या गोष्टी कलाकृतीचं बजेट, मार्केट, वेळ, कित्येक वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं.


महिन्याला मिळणाऱ्या पगारावर घर चालवण्याएवढं तरी ते नक्कीच सोप्पं नाही. आज हॉलिवूड च्या कित्येक दर्जेदार चित्रपटांचे ग्राफिक्स, व्हिएफएक्स भारतातल्या अग्रगण्य निर्मिती कंपन्या करतात. हजारो मंडळी यामागे काम करतात तर तेच दर्जेदार काम भारतीय सिनेमांसाठी का होत नाहीये आणि ते लवकर तेव्हाच होईल जेव्हा दिग्दर्शक एखादी कलाकृती घेऊन येतो तेव्हा त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सर्व गणितं तो जुळवून घेऊ शकेल. मात्र, प्रेक्षक म्हणून आपण ट्रोल केलं तर नवनवीन प्रयोग होणार तरी कसे? 


अलीकडेच 'ब्रह्मास्त्र' चित्रपट आला त्याच दरम्यान 75रुपायांत सिनेमा पाहायची संधी मिळाली अन् सगळेच्या सगळे चित्रपट हाऊसफुल्ल होते. मग प्रश्न पडतो आपण बॉयकॉट खिशाला परवडत नाही म्हणून करतोय की, विरोधाला विरोध म्हणून करतोय? बरं विरोध करत असू तर नावं ठेवण्यासाठी आपण पात्र आहोत का हा प्रश्न पडायला हवाच ना?


दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचं उदाहरण पाहुयात. 'बाहुबली' चित्रपटाचा विचार त्यांच्यात डोक्यात सुरू  होता. मात्र, त्याआधी त्यांनी 'मगधीरा' सारख्या सिनेमा तयार केला. त्यानंतर त्या अनुभवाच्या आधारे, 'बाहुबली'सारखा भव्यदिव्य चित्रपट साकारता आला आणि यश मिळवता आलं. चित्रपट निर्मिती करण्यापासून ते तो थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याचा हा टप्पा कोणत्याही दिग्दर्शक मंडळीसाठी एक बाळ जन्माला घालण्यासारखी गोष्ट असते. 


नावं ठेवत बसायचं, अमुक असं झालं तमुक तसं हवं होतं त्यातलं ते कॉपी केलंय... यातलं हे होतं, भावना दुखावल्या... बॉयकॉट करा... ट्रोल करा... 


कधी विचार केलाय, आपण एखादी गोष्ट मनापासून केलीय आणि त्याचं कौतुक कोणी केलं नाही आणि नावं ठेवली तर कसं वाटतं? दुसऱ्यांच्या लग्नातील जेवणावर नावं ठेवणाऱ्यांनो, स्वतःच्या घरातील कार्यात काय सोन्याचा मुलामा असलेले पदार्थ शुद्ध तुपात तळून  ठेऊन होते का? हे ही बघावं... 


एकवेळ चांगलं म्हणू नका, कौतुक करू नका मात्र मेहनतीला दाद मिळावी... समोरच्याला अडचणीत टाकण्यात पटाईत सराईत असण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी जवळ असाव्यात त्या जपल्या जाव्यात असा विचार समाजात सोशल मीडियावर अजिबात दिसत नाही आणि ही तीच रिकामटेकडी मंडळी असतात ज्यांच्यामुळं ट्रेंड होतो. प्रेक्षक काय बघतात, काय लिहतात तेच मीडिया दाखवते. मात्र गोष्टींचा चौफेर आढावा हल्ली घेऊन कोणीही अभ्यासपूर्ण लिहत नाही याचं दुर्दैव आहे. 


कलाकार म्हणून नाही मात्र प्रेक्षक म्हणून मी जेव्हा कलाकृती पाहतो, आपण काय पाहतोय? का पाहतोय? केवळ मनोरंजन की माहितीसाठी पाहतोय. तर, मग बुद्धी न चालवता केवळ मनोरंजन म्हणून पाहावं, त्यात तर्क-वितर्क, 
विज्ञान जोडलं पाहिजेच, इतिहासाचे दाखले दिले पाहिजे असं नाही ना! 


आवडलं तर आवडलं, मला नसेल आवडलं म्हणून मी द्वेष करणं चुकीचं असेल, कदाचित दुसऱ्या कोणाला ते आवडलं देखील असेल... प्रत्येकाच्या कक्षा वेगवेगळ्या असतात. सगळ्यांनी ठरवून एकत्र येऊन एकवेळ एखाद्याला एकटं पाडलं जाईल, बॉयकॉट केलं जाईल मात्र तरी देखील जिंकलं कोणी नसतं आणि हरलं देखील कोणी नसतं.


प्रत्येकाच्या आतला रावण बाहेर यायला एक संधी पुरेशी असते, तो कधीही पेटू शकतो. मात्र विवेकबुद्धी गहाण ठेवली नसेल तर सगळं चांगलंय म्हणून आनंदी रहायला काय प्रॉब्लेम आहे?


तसं पाहिलं तर वाईट काहीच नाही, वाईट वृत्ती असते... शब्दांनी वाटलेली साखरसुद्धा कडू माणसांना गोड करतेच.


विनीत वैद्य यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग

BLOG : झेपावे मिलियन्सकडे...

BLOG | पट्टा से हेडशॉट, गेम ओव्हर...