हल्ली ना 'Quotes' चा जमाना आहे, रोजचा दैनंदिन दिवस हा एक 'कोट' असतो.


इन्स्टावर तुम्हाला असं एखादं भन्नाट कोट आवडतं जे तुमच्या आयुष्याशी फारच Relate करणारं असतं किंवा कोणीतरी Motivational संन्यासी बाबा किंवा अतरंगी कलाकार असतात ना ज्यांनी  कोट्यवधी कमावलेत त्यांच्या आयुष्यात ते मस्त सुखी आहेत अशी मंडळी आयुष्य जगण्याचा Formula तुम्हाला सांगत असतात किंवा कोट्सच्या चार लिहलेल्या ओळी आपल्या आयुष्याचा असा भाग होतात की त्या आपण शेअर करतो. आपल्या Whatsapp च्या स्टेटसला स्क्रिनशॉट मारून लावून देखील ठेवतो...ठेवतोच ना!


कदाचित तुमचं म्हणणं तुम्हाला सगळ्या दुनियेला सांगायचं असतं, तुम्हाला व्यक्त  व्हायचं असत किंवा तुमचं Target तुमचा संदेश  कोण्या एका व्यक्तीसाठी असेलही मात्र तुमच्या स्टेटस ठेवण्याचा अर्थ, पाहणारे सर्व जण वेगवेळ्या पद्धतीने लावत असतील किंवा घेत असतीलही मात्र ही एकलकोंडी परिस्थिती का उद्भवली असावी याच्या जरा याकडे वाकून पाहायला हवंच...


'भलताच झोल झालाय आणि कळतंच  नाहीये काय करावं? यार विनीत, अशी परिस्थिती आहे इथं काय करावं?' बऱ्याच वेळा असे अनेक प्रश्न Randomly कधीही धाडकन अंगावर येतात. कळत नाही आपण काय सांगावं, मार्ग दाखवण्या इतपत मी स्वतः तरी काय फार दिवे लावले आहेत? हा प्रतिप्रश्न मला पडतो! आपल्या स्वतःच्या मतांवर किंवा निर्णयावर हल्ली ठाम उभं असणं हे फारच अवघड होत चाललंय, असं पुष्कळ प्रसंगी तुम्ही अनुभवलं असेल किंवा तुम्हालाही जाणवलं असेलच! कदाचित आजूबाजूला असलेला प्रवाह ज्या दिशेला जातोय त्या दिशेला न जाता आपण प्रवाहाच्या उलट्या दिशेला पोहावं हे शाळेत अगदी सुरुवातीच्या मराठी शाळेत गुरुजी सांगायचे तर इंग्रजी शाळेत 'Only Dead Fish Go With the Flow' हे असं सांगितलं जायचं कदाचित तिथूनच खरं राजकारण आपल्या रक्तात आलेलं आसवं असं वाटतं.Political राजकारण हे आजकालच्या आयुष्याचा जवळपास अविभाज्य घटक झालेला आहेच, हा ब्लॉग वाचणारी कोणतीही व्यक्ती दरदिवशी कोणतातरी 'Game' खेळण्याच्या नादात असू शकते. मात्र या इरशिरीनं एकमेकांच्या ताटात 'Stress, नैराश्य, काळजी, चिंता, इर्षा, Ego अशा किती तरी गोष्टी वाढल्या जात आहेत. त्या जोडीला मीठ-मसाला आणि प्रत्येक गोष्टीला वरून दिलेली फोडणी किंवा शहरी भाषेत तडका देखील असतो...


पुढे जाण्यासाठी वाट्टेल ते करणं, वाट्टेल तो मार्ग स्वीकारणं, आपला तो परमार्थ दुसऱ्याचा तो स्वार्थ, हेकेखोरी, जळणे यातून साध्य काय करायचंय? काय मिळवायचंय? जे मिळवलंय त्यात समाधान तरी असणार आहे का? असे अनेक प्रश्न समोर उभे असताना जगासमोर एक समूह भन्नाट आणि मनासारखं मनसोक्त काम करण्यात व्यस्त आहे. Artificial Intelligence आपल्याला एका नव्या विश्वाच्या उंबरठ्यावर घेऊन जातंय...Rolls Royes आता चंद्रावर Nuclear Reactor उभं करतंय...आजूबाजूला तमाम बारा भानगडी सुरू आहेत. ChatGPT सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागलंय, तुमच्या हातात मनोरंजनाचं असं माध्यम आहे जे सोबत असेल, तर तुम्हाला कोणाचीही गरज नाही, ही भावना निर्माण होते.


मात्र कधी एखाद्या निर्मनुष्य बेटावर किंवा जंगलात तुम्ही एकटेच इंटरनेट शिवाय अडकला असाल तर काहीही करता येणार नाही. तिथं तुमच्यामध्ये असलेला मुक्तछंद तुम्हाला जिवंत ठेवणार, तिथं कोणतं गुगल येणार नाही जे काही Searching करायचं ते स्वतःमध्ये करावं लागेल. तरच प्रश्न सुटतील...


आपण दररोज एक उत्तर शोधून झोपतोय तर पहाटे उठताना नवा प्रश्न घेऊन  जागे होतोय.  एकमेकांची डोकी फोडतोय, समविचारी लोकं फक्त घोळक्यात असतात. त्यात फक्त विचारच असतात विनिमय उरलेलाच नसतो. ते विचार Practicaly उतरताना दिसतच नाही. मात्र किडे करणारी मंडळी Unplanned Things सोबत काम मिळून करताना दिसतात. मात्र ते काम Productive नसतं केवळ कुरापती करण्याचं असतं... यात वेळ घालवायला मिळतो तरी कसा? बऱ्याचवेळी आपल्या आयुष्यात ही वेळ नक्की येते जेव्हा 
जिथं दोन्ही दगडांवर पाऊल ठेवून वाट शोधत फिरलं तरंच आयुष्यात काही करायचंय,
जिथं पोहोचायचंय, ध्येय आहे तिथं जाता येईल असं वाटत राहतं, मात्र असं नाही...


आपल्यावर झालेले संस्कार आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगी समोर जाताना उपयोगी ठरतात. कधी आपलं स्वतःचं काही म्हणणं असतं, असेलही मात्र सगळ्यांनाच गृहीत धरून नाही चालता येणार! प्रत्येकाचा विचार जिथे झुलतो तिथंच त्याचा झोका उंच जाणार... हेही ठरलेलं असतं.


आजूबाजूला असणारा प्रत्येक माणूस हा ज्याची त्याची कथा जगत असतो, सगळेच आपल्याला सोबत घेऊन जाणार आहेत, सगळेच मदतीला धावणार आहेत हे काहीही शाश्वत सत्य नाहीये, प्रत्येकाची एक टाईमलाईन असते त्यात त्याचं यशस्वी होणं, कर्तृत्व सिद्ध करणं हे झालेलं असतं तरी इतरांवर नाहक शंका उपस्थित करणं गरजेचं नसतं...एकमेकांच्या उरावर बसून एखादी गोष्ट मिळवली म्हणजे समाधान नक्कीच नाही, ज्याला बुडवलं तो व्यक्ती त्या तळाला काहीतरी नवीन शोध घेऊन तिथेच रममाण होईल मात्र किनारा गाठलेला अजूनही हव्यासात अडकलेला असेल. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध उरलाच तर त्या वेळेत इतरांच्या कामात कमी आणि आपल्या-आपल्या कामात व्यस्त असलेलं काय वाईट?  मात्र तिथं तुम्ही शिष्ट ठरता.


सगळ्यांनी सगळंच करावं असंही नाही. जिथं हाताची बोटं सारखी नसतात, घरातली चार भावंडं एकमेकांना भांडून वेगळी राहतात तिथं तीच मंडळी त्यांच्या ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी सुख शोधताना दिसतात. त्यांना घरचा रस्ता दिसतच नसतो.


हल्लीच्या Youth चा स्ट्रगल भलताच ताणला गेलाय. आधी आवडत्या शिक्षणासाठी धडपड मग पुढे उत्तम नोकरी मिळवण्यासाठीचं Struggle आणि नोकरी कामाची वेळ आणि घर-परिवार यांचा समन्वय सगळीकडं असलेलं राजकारण, त्यात होणारा मानसिक ताण. Relaxation होण्यासाठी लागलेली व्यसनं यात बिघडलेलं शारिरीक आरोग्य याकडे पाहिलं तर सगळं काय सुरू आहे हेच कळत नाही.


आधी तुमची स्टाईल, तुमचे कपडे, तुमची चाल कॉपी केली जायची. आता चक्क तुमचं व्यक्तिमत्त्व कॉपी केलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर, जो समोरचा व्यक्ती नाहीये तरी तो एखाद्या व्यक्तीसारखं होण्यासाठी त्याच्या आवडी-निवडी पासून A टू Z गोष्टी नकळतपणे त्याच्या आयुष्यात छापत असतो. पण एवढं करूनही तो प्रत्येक ठिकाणी त्याची कॉपी करेलही, मात्र वेळ आलीच की, त्याचे खरे रंग कालांतराने समोर येतातच. Adopted Artificial Things चं पितळ उघडं पडतंच. कारण स्वतःची बुद्धी स्वतःचे विचार शिल्लक राहिलेच कुठे आहेत? Instagram Reel वरून Motivation घेणारी मुलं हल्ली करणार तरी काय?


तुम्ही मुंबईत असाल किंवा इतर कोणत्याही शहरात तर आजूबाजूला चिक्कार परदेशी पाहुणे फिरायला येत असतील तर त्यांच्याशी संवाद साधाच.. मध्यंतरी मला काहींशी चर्चा करायचा योग आला. 
स्पेनवरून आलेल्या एका जोडीने सांगितलं 'आम्ही भारत फिरण्यासाठी थोडे पैसे कमावले आणि इथे आलो आहोत, पैसे संपले की पुन्हा ते कमवून पुढचा प्लॅन करणार, आम्हाला इस्टेट ना प्रॉपर्टी आहे' 
त्यांची बरीच उत्तरं अचंबित करणारी होती... का बरं आपल्याकडे ही मानसिकता नाहीये? आपण करतो तेच भारी, 'बघ, आता मी त्यांची कशी जिरवतो' हे असं का?
पावलो पावली स्वतःला सगळं सिद्ध करत फिरायचं या गोष्टी आपणच एकमेकांवर लादल्या आहेत. 
आणि यशस्वी व्हायचे तर सगळ्यांशी गोड बोलून राहायचं? कदाचित हीच मंडळी तुमची कधी नसतात देखील तुमच्या धाकापायी जमलेली भूतं असतात. मग आपण आपल्यावर झालेले संस्कार, आपलं मत, म्हणणं, Dignity सोडून या दोन्ही दगडांवर उभारणारे कदाचित  तात्पुरते यश मिळवून दाखवतील देखील मात्र मनाची अशांतता आणि 
त्यांना सांगण्यासाठी स्वतःचं असं काहीही उरलेलं नसतं. 
तुमच्यातील मुक्तछंद जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत इतरांनी कितीही प्रयत्न केले तरी ते तुम्हाला रोखू शकणार नाही..


विनीत सतीश वैद्य  vinit.s.vaidya@gmail.com 


विनीत वैद्य यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग 


Blog : झेपावे मिलियन्सकडे...




(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत.
त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही).