Navratri 2022 : घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरुवात होते. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्राला विशेष महत्त्व असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून तसेच देवीच्या विविध रूपांची पूजा करून नवरात्रीचा (Navratri) सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात (Maharashtra) साडेतीन शक्तीपीठांसोबत देवीची विविध प्राचीन आणि प्रसिद्ध अशी मंदिरं आहेत. या ठिकाणी देखील आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Ghatsthapana) प्रारंभ होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या शैलपुत्री (Shailputri) या रूपाची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीचा इतिहास आणि तिची आख्यायिका काय आहे? ते जाणून घेऊयात... 


दुर्गेचं पहिलं रूप 'शैलीपुत्री' या नावानं ओळखलं जातं. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असं नाव पडलं. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसांपासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते.


या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचं फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तिनं प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असं होतं. तिचा विवाह शंकराशी झाला होता.


एकदा राजा प्रजापतीनं मोठा यज्ञ केला होता. या यज्ञासाठी त्यानं सर्व देवदेवतांना निमंत्रित केलं होतं. परंतु, त्यानं शंकराला निमंत्रित केलं नव्हतं. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचं समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिनं आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकरानं तिला सांगितलं की, प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावलं आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिलं नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणं मला योग्य वाटत नाही. शंकरानं समजावून सांगितलं तरीही तिचं समाधान झालं नाही. वडीलांचा यज्ञ पाहणं, तसेच आपल्या आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचं मन व्याकूळ झालं होतं. तिचा आग्रह पाहून शंकरानं तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.


सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचं स्वागत केलं नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचं तिला दिसून आलं. दक्ष राजानं शंकराविषयी काही अपमानकारक शब्दह‍ी वापरले होते. हे सर्व पाहून ती संतप्त झाली आणि शंकरानं सांगितलं तेच योग्य होतं, असं तिला वाटलं.


आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे. याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न झाल्यानं तिनं स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतलं. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्यानं लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीनं पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावानं प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती ही तिचीच नावं होती. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचं महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्त्वाच्या इतर बातम्या :