Pradosh Vrat 2024 : वैदिक पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळलं जातं. प्रदोष व्रत करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. या व्रताचं पालन केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो, असंही मानलं जातं.


आज, म्हणजेच 21 फेब्रुवारी 2024 रोजी माघ महिन्यातील दुसरा आणि शेवटचा प्रदोष व्रत (Pradosh Vrat) पाळला जात आहे. ज्योतिषशास्त्रात प्रदोष व्रताच्या दिवशी काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे, या दिवशी काही नियम मोडल्यास जीवनात समस्या उद्भवतात. प्रदोष व्रताच्या नियमांबद्दल जाणून घेऊया.


प्रदोष व्रताच्या दिवशी करू नये 'या' गोष्टी



  • प्रदोष व्रताच्या दिवशी कोणालाही शिवीगाळ करू नये. कोणाविषयी वाईट चित्तू नये. प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराला सिंदूर, हळद, तुळशी आणि नारळाचं पाणी अजिबात अर्पण करू नये. यामुळे या व्रताचा लाभ मिळत नाही,अशी मान्यता आहे.

  • प्रदोष व्रताला महिलांनी महादेवाच्या पिंडीला हात लावू नये. असे केल्याने माता पार्वतीच्या क्रोधाला सामोरं जावं लागतं, असं म्हणतात.

  • प्रदोष व्रतात तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. व्रताच्या दिवशी सात्विक राहिल्यास मानसिक शांती लाभते. यामुळे या दिवशी मद्य, मांस, कांदा, लसूण, तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. 

  • प्रदोष व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण याचा दोष आपल्याला नंतर सहन कराला लागतो.

  • उपवास करणाऱ्या व्यक्तीने भात आणि वातळ अन्न खाऊ नये. सकस आणि सात्विक आहार घ्यावा.

  • काळा रंग नकारात्मकता आकर्षित करतो, यामुळे प्रदोष व्रतादिवशी काळे वस्त्र परिधान करू नये.


प्रदोष व्रताचे महत्त्व 


प्रदोष व्रतात महादेवाची पूजा-आराधना केल्यानं मनुष्याची सर्व संकटं नाहीशी होतात आणि रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान भोलेनाथांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. प्रदोष व्रत केल्यानं व्यक्तीला धन, ऐश्वर्य, सुख, सौभाग्य, समृद्धी, आरोग्य, संतान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.


प्रदोष व्रतात शिवलिंग पूजेचे महत्त्व


शास्त्रानुसार, या दिवशी ब्रह्मा बेताल, देव, गंधर्व असे सर्व दिव्य जीव त्यांच्या सूक्ष्म रूपात शिवलिंगात लीन होतात. त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात केवळ शिवलिंगाचं दर्शन घेतल्याने सर्व जन्मांची पापं नष्ट होतात. तसेच त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात बेलाची पानं अर्पण करून दिवा लावल्याने मोठे पुण्य प्राप्त होते. या व्रताचं महत्त्व यापूर्वी भगवान शंकरांनी सती माता यांना सांगितलं होते. कलियुगात फक्त प्रदोष व्रत आहे, जे माणसाचे रोग, दोष आणि दुःख नष्ट करून सुख प्रदान करते, असं शास्त्रात सांगितलं आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Pradosh Vrat : आज बुध प्रदोष व्रत! 'या' शुभ मुहूर्तावर करा शंकराची पूजा; सुटतील सर्व समस्या