Maharashtra Untimely Rains: महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय. भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. मात्र, या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. दरम्यान, हातातोंडाला आलेलं पीक जाईल या भीतीखाली अनेक शेतकरी आहेत.


शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पावसासह मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे. पावसादरम्यान हवेचा वेग वाढणार असून ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे, महाराष्ट्रातील पीक काढणीला आली असल्यानं शेतकऱ्यांना अवकाळी पाऊसामुळं मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 


जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस
आज पासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह  जळगाव जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. हवामना खात्याचा हा अंदाज खरा ठरलाय. जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याचं दिसून आले. ज्वारी, हरबरा आणि गहू काढणीच्या तोंडावर अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांन पुढे पुन्हा एकदा संकट निर्माण झालंय. दरम्यान, गहू, हरबरा आणि दादर पिकाचं नुकसान होण्याचा अंदाज आता वर्तविला जातोय.


आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
हवामान विभागानं अवकाळी पावसाचा इशारा देत औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला होता. दरम्यान, आज 5 वाजेनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यातील काही गावांमध्ये प्रत्यक्षात पावसाला सुरवात झालीय.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha