Unseasonal Rain in Ratnagiri :  राज्यासह कोकणात मागील काही दिवस पाऊस, गारा, सोसाट्याचा वारा आणि कडाक्याचं ऊन असं चित्र पाहायाला मिळत आहे. त्यामुळे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आंबा आणि काजु पिकाला देखील याचा मोठा फटका बसला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका बागायतीला बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील मागील काही दिवस सातत्यानं विजांच्या कडकडाटासह जोडीला सोसाट्याचा वारा आणि गारांचा पाऊस कोसळला होता. यामुळे जिल्ह्यात घरे, गोठे, दुकानं यांचं अंदाजे 62 लाखांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका हा चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याला बसला आहे. जिल्ह्याचा सारासार विचार केल्यास घरांच्या नुकसानीचा आकडा 58 लाखांच्या घरात आहे. त्याशिवाय, पोल्ट्री फार्म, शौचालय, शाळा, दुकानं यांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तसेच जिल्ह्यात आंबा पिकाला देखील सर्वाधिक फटका बसला आहे. जवळपास 900 पेक्षा देखील जास्त शेतकऱ्यांना हे नुकसान सहन करावे लागले आहे. 400 हेक्टरवरील बागायतीला अवकाळीचा फटका बसला असून संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील नुकसानीचा आकडा सर्वाधिक आहे. 


तालुक्यांमध्ये नेमकी काय स्थिती? 


वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दापोली तालुक्यात 4, खेडमध्ये 11, गुहागरमध्ये 17, चिपळूणमध्ये 112, संगमेश्वरमध्ये 142 घरं बाधित झाली आहेत. संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात 392 हेक्टरवरील आंबा बागायतीचे नुकसान झाले असून त्यानंतर 11 हेक्टरवरील काजुला बागांना देखील फटका बसला आहे. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील शासनाकडून करण्यात आले आहे. 


कोकणी मेव्याला देखील फटका


कोकणात मागील सहा महिन्यांमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसला आहे, पण, कोकणी रानमेवा अर्थात जांभूळ, कोकम, करवंद यांना देखील या वातावरणाचा फटका बसला आहे. अवेळी कोसळणारा पाऊस, गायब झालेली थंडी, वाढत्या उन्हाचा कडाका असं विचित्र वातावरण कोकणात मागील सहा महिन्यांमध्ये पाहायाला मिळालं. त्यामुळे अर्थातच रानमेव्याला मोठा फटका बसला आहे.