Yavtmal Farmer Agitation : यवतमाळ जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरु असलेली चना खरेदी मंदावली आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरेदी मंदावल्याने तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. चना खरेदीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी  याठिकाणी शेतकऱ्यांनी भोंगा आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सायकलवर भोंगा लाऊन आक्रोश रॅली काढली.


यवतमाळ जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरु असलेली चना खरेदी मंदावल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बारदाना उपलब्ध होत नसल्याने व चना साठवणुकीसाठी गोदाम नसल्याने तसेच प्रशासकीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आर्णी येथे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांच्यासह शेतकऱ्यांनी सायकलवर भोंगा लाऊन आक्रोश रॅली काढली. महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करुन भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निवेदन पाठवण्यात आले आहे. या सायकल रॅलीद्वारे शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावर धडक देत त्याठिकाणी सामूहिक मारुती स्तोत्र पठण केले. 




नाफेडकडून चना खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसून, त्यांची लूट सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नाफेडच्या केंद्रावर सर्व सुविधा पुरवाव्यात अन्यथा शिवसेना अक्षय तृतीयेनंतर हिसका आंदोलन करेल असा ईशारा बाळासाहेब मुनगीनवार यांनी दिला.  सर्व सेंटर लवकर सुरु झाली पाहिजेत. जर तसे झाले नाहीतर आम्ही संपूर्ण यवतमाळ  जिल्हाभर आंदोलन करु असा इशारा मुनगीनवार यांनी दिला आहे. नाफेडकडून दररोज 1 हजार 500 पोत्यांची खरेदी झाली पाहिजे. नाहीतर शिवसेना पद्धतीने आम्ही आंदोलन करु असेही ते म्हणाले.


जेवढा हवा तेवढा बारदाना सध्या उपलब्ध होत नाही.  बारदाना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी नाफेडची आहे. मात्र त्यांच्याकडून पूर्तता केली जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी आंदोलकांकडून भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. 


महत्त्वाच्या बातम्या: