Pandharpur Rain News : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. याचा शेती पिकांना फटका बसत आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका द्राक्षाच्या बागांना (Grapes crop) बसला आहे. पावसाचे पाणी द्राक्षाच्या घडात जाऊन मणी गळायला सुरुवात झाली आहे. पाणी घडात राहिल्यानं आता कुजीने हे घड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच डाळिंब आणि आंबा उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत.  


पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, करकंब, खर्डी परिसरात जोरदार पाऊस


बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्री वादळाचा परिणाम महाराष्ट्र राज्यातही दिसून येत आहे. वादळाच्या स्थितीमुळं राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. तर कुठे ढगाळ हवामान असल्यानं फळ बागायतदार शेतकरी धास्तावला आहे. काल सायंकाळी पंढरपूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळं द्राक्ष बागांना फटका बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, करकंब, खर्डी परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. द्राक्ष बागेत माल कमी असताना आता या पावसानं झाडांना लागलेला फुलोरा गाळून पडू लागला आहे. याशिवाय पाणी घडात जाऊन मणी गळायला सुरुवात झाली आहे. हे पाणी घडात राहिल्यानं आता कुजीने हे घड पडणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.


फवारणीसाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागणार


या पावसाच्या फटक्यातून वाचलेल्या द्राक्ष बागांना दवण्या आणि भुरीपासून वाचण्यासाठी पुन्हा हजारो रुपयांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळं बळीराजा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकरी विविध कारणाने संकटात सापडत आहे. त्यामुळं अडचणीत असणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेत येऊन सरसकट पंचनामे करावेत. तसेच शासनानं नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.


अवकाळी पावसाचा आंबा पिकावरही परिणाम


कासेगाव, करकंब हे द्राक्ष उत्पादक हब म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. मात्र, सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक संकटाने ही ओळख आता पुसायची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. द्राक्षासोबतच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला असून, पुन्हा तेल्या आणि मर रोगानं द्राक्ष आणि डाळिंब बागा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच अनेक ठिकाणी सध्या आंब्याला मोहोर लागला आहे. या पावसानं मोहोर गळून पडू लागल्यानं आंबा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आहे. ज्वारीच्या पेरण्या अनेक ठिकाणी लांबल्या असल्या तरी ज्या ठकाणी ज्वारी येऊ लागली आहे, तिथे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. गहू आणि हरभरा उत्पादक शेतकरी देखील या पावसामुळं अडचणीत आले आहेत. सध्या गव्हावर तांबवा रोगाची भीती वाढली आहे. अजून तीन ते चार दिवस हा अवकाळी पाऊस राहिल्यास फळबागायत शेतकऱ्यांना पुन्हा फवारणीसाठी जादाचे लाख ते दीड लाख रुपये फवारणीसाठी घालवावे लागणार आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Mango farmers : बदलत्या वातावरणाचा हापूसला फटका, आंब्याची फळ प्रक्रिया विस्कळीत; लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात