Ajit Pawar on Farmers suicides : राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 45 दिवसात राज्यात 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers suicides) केल्या आहेत. दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलं पाहिजे. आताच्या सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घ्यावं, असा सल्लाही अजित पवारांनी दिला. तसेच पवार साहेबांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला कशा पद्धतीनं स्वयंपूर्ण केलं, हे आपण पाहिलं असल्याचेही ते म्हणाले. 


मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही


मदतीसाठी राज्यातला शेतकरी फार आशेनं सरकारकडे बघत आहे. तुम्ही-आम्ही जनतेचं प्रतिनिधित्त्व करताना आत्महत्या होणं ही लाजिरवाणी बाब आहे. हे सरकार निष्क्रिय नाही हा विश्वास जनतेला, बळीराजाला द्या असेही अजित पवार म्हणाले. सभागृहात केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुसान झालं आहे. त्यामुलं राज्यात ओला दुष्काळ जाहीर केल्यास त्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल असेही अजित पवार म्हणाले. अतिवृष्टीमुळं ज्या भागातील जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली अशा ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफ करावं. शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी. खावटी अनुदान पैशाच्या रूपात द्यावं अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.


पिकांसाठी हेक्टरी 75 हजार रुपये, तर फळ पिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची मदत द्यावी


पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळं सरकारनं  पिकांसाठी हेक्टरी 75 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, तसेच फळ पिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत सरकारनं जाहीर करावी अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली आहे. त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून 1 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरु करण्याची परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पुढे जाईल असेही ते म्हणाले.


गोगलगायमुळं मराठवाड्यात सोयाबीनचं मोठं नुकसान, नुकसान भरपाई द्यावी
 
मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, बीड, लातूर याठिकाणी गोगलगायमुळं कोवळ्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. उगवलेलं सोयाबीन गोगलगायनं खाल्ल्यानंतर नुकसानभरपाईची तरतूद नियमात नाही, त्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. या सरकारला पीककर्जाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा लागेल. पीककर्ज माफ केलं पाहिजे. कोसळलेल्या घरांच्या नुकसानभरपाईसह ओलाव्यामुळं भेगा पडलेल्या घरांचाही पंचनामा झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शाळा, शासकीय इमारतींचे देखील पंचनामे झाले पाहिजेत अशी मागणी अजित पवारांनी केली.
सोयाबीनचा प्रतिएकर खर्च 11 हजार 700 रुपये आहे. तर कापसाचा प्रतिएकर खर्च हा 11 हजार 570 रुपये येतो. असं असताना आताच्या सरकारनं हेक्टरी केवळ 13 हजार 600 रुपयांची  मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यान काय करावं? कसं जगावं? प्रपंच कसा चालवावा? असे सवालही अजित पवारांनी सभागृहात उपस्थित केले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: