Sadabhau Khot : निर्ढावलेल्या राज्य सरकारच्या कानापर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात उद्या कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी दिली. निफाड तालुक्यातील रुई या गावात ही कांदा परिषद होणार आहे. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या परिषदेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. 


'जागर शेतकऱ्याचा आक्रोश कांदा उत्पादकांचा'


उद्या होणाऱ्या कांदा परिषदेला राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन देखील सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. 
आता आपण स्वस्थ बसून राहणार नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ह्या आघाडी सरकारला द्यावाच लागेल. त्यामुळे आम्ही 'जागर शेतकऱ्याचा आक्रोश कांदा उत्पादकांचा' करणार असल्याचे खोत म्हणाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश  राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये रुई या गावात 5 जून 2022 रोजी भव्य कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे. 


कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष


कांद्याचे दर हे सध्या 1 रुपये ते 3 रुपयापर्यंत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आहे. काही ठिकाणी कांदा उत्पादकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा जनावरांना शेतकरी खाऊ घालत आहे. त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचताना दिसत नाही. कांद्याच्या दराबाबत सहकार आणि पणन मंत्र्यांनी बैठक घेणं गरजेचे होतं मात्र, तसे झाले नसल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. कांद्याला अनुदान देणं गरजेचे होते, देवेंद्र फडणवीस सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान दिले होते. गुजरात सरकारने कांदा उत्पादकांना तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य सरकारनं कांद्याला प्रतिकिलोला पाच रुपयांचे अनुदान द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे खोत म्हणाले. सरकार डोळेझाक करत असेल तर आम्ही याविरोधात आवाज उठवू असा इशारा खोत यांनी यावेळी दिला.


महत्वाच्या बातम्या: