Unseasonal Rain : वातावरणीय बदलामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यासह राज्याच्या विविध ठिकाणी ढगाळ स्थिती आणि अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे येणाऱ्या शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी गहू, कांदा, टोमॅटो, द्राक्ष, मिरची, डाळिंब आदी पिकांवर येणाऱ्या संभाव्य रोगांवर वेळेत योग्य ती उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.


दरम्यान गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिक जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन केले आहे.


गहू


गहू हे पिक काढणीस तयार झाले असून पावसाची उघडीप होताच पीक काढावे किंवा मळणी करावी. पीक काढणीस 15 ते 20 दिवस अवधी असल्यास अशा पिकात सध्याच्या वातावरणामुळे गव्हाच्या दाण्यावरील काळे टोक समस्या वाढू शकते. त्यासाठी डायथेन एम 45, 20 ग्रॅम + कॉपर ऑक्झिक्लोराईड 20 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी या  प्रमाणात मिसळून फवारणी करावी. 


कांदा


कांदा या पिकात पाण्याचा निचरा न झाल्याने मर रोगाची लागण पिकाला होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीने चर काढावेत. कांदा पिकावर जांभळा करपा आणि फुलकीडीचे प्रमाण वाढल्यास टेब्युकोनॅझोल 25 टक्के, डब्ल्यू जी 10 मिली किंवा ॲझोक्झिस्ट्रॉबीन 18.2 टक्के अधिक डायफेनोकोनॅझोल 18.3 टक्के, एस सी 10 मि.ली. यापैकी 1 बुरशीनाशक अधिक फिप्रोनील 15 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. त्याचप्रमाणे फुलकिडीच्या नियंत्रणासाठी  फिप्रोनिल 15 मिली किंवा प्रोपेनोफॉस 10 मिली किंवा कार्बोसल्फॉन 10 मिली अधिक स्टीकर 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात गरजेनुसार मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी  दिली आहे.


टोमॅटो


टोमॅटो पिकावर करपा आणि विविध बुरशीच्या प्रादुर्भावामुळे ठिपक्या रोगाचे प्रमाण वाढते. अशा झाडांवरील रोगग्रस्त पाने गोळा करुन जाळून नष्ट करावीत. या रोगांच्या नियंत्रणाकरीता बुरशीनाशकांची प्रमाणात आलटून पालटून फवारणी करावी.


द्राक्ष


द्राक्ष हे अतिशय संवेदनशील फळपीक असून तापमानातील चढउताराचा अनिष्ट परिणाम होतो. यावर नियंत्रणासाठी सल्फर 80 WDG 2.0 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी किंवा ही फवारणी करतांना घडावर डाग येऊ नये, म्हणून चांगल्या दर्जाचे स्प्रेडर्स वापरावेत. किंवा बुरशी नाशकांची प्रमाणात फवारणी करुन वेलीवरील चिरलेले आणि सडलेले मणी आधी काढून टाकावेत. त्यानंतर बागेमध्ये क्लोरीनडाय ऑक्साईड 50 पीपीएम या प्रमाणात फवारणी केल्याने रेसिड्यूची समस्या निर्माण होत नाही. द्राक्ष बागेतील पाने आणि घडांमधील साचलेले पाणी काढण्यासाठी रिकामा ब्लोअर उलटसुलट बागेत फिरवल्यास बागेतील आर्द्रता कमी होण्यास मदत होते.


मिरची


मिरची या रोग नियत्रंणासाठी  डायफेनकानॅझोल 10 मिली किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.


डाळिंब


डाळिंब या पिकासाठी डायफेनकानॅझोल 25 टक्के ईसी. 10 मिली किंवा किटाझीन 48 टक्के 10 मिली. किंवा मॅटीरम 55 टक्के अधिक पायऱ्या क्लोस्ट्रोबीन 0.5 टक्के डब्ल्यू जी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी. त्याचप्रमाणे शेतातील जमिनीवर झाडावर व बांधावरील सर्व रोगग्रस्त पाणी फळे फांद्या व रोगट अवशेष गोळा करुन नष्ट करावेत तसेच चार टक्के कॉपर डस्ट बागेमध्ये धुरळावी. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने संपूर्ण झाडावर बोर्डो मिश्रण 1 टक्के फवारावे किंवा बॅक्टिनाशक 5 ग्रॅम + कॅप्टन (0.5 टक्के) 50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी.


अवकाळी पावसामुळे करावयाचे व्यवस्थापनबाबत प्रा. राजेंद्र बिराडे, प्रभारी अधिकारी, पिंपळगाव बसवंत कांदा द्राक्ष संशोधन केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) डॉ.राकेश सोनवणे, डॉ. गंगेश बडगुजर तसेच डॉ. बबनराव इन्डे यांनी वरीलप्रमाणे उपाययोजना सुचवलेल्या आहेत, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.