High Temperatures : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. उकाड्यापासून आराम मिळण्यासाठी अनेकचा कल लिंबू पाण्याकडे गेला आहे. त्यामुळे लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण एकीकडे मागणी वाढली असतानाच दुसरीकडे उत्पादन मात्र घटल्याचे चित्र आहे. कारण, मध्येच आलेल्या आवकाळी पावसाने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. परिणामी मागणी वाढल्यामुळे लिंबाच्या किंमतीमध्येही मोठी वाढ पाहायला मिळत आहे.


देशात सध्या सुरु असलेली उष्णतेची लाट आणखी दोन महिने राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अंगाची लाही लाही होणार हे नक्की. लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी किंमतीही गगणाला भिडल्या आहेत. पुण्यातील घाऊक मार्केटमध्ये एका लिंबाची तब्बल पाच रुपये इतकी झाली आहे. तर किरकोळ मार्केटमध्ये हे लिंबू दहा ते 12 रुपयांना विकले जाते. महिनाभरापूर्वी पाच ते दहा रुपये किलोप्रमाणे विक्री होणा-या लिंबाच्या किंमतीत या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे


महाराष्ट्रातून लिंबू मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या मार्केटमध्ये पाठवले जातात. आंध्र प्रदेश सर्वात जास्त लिंबाचे  उत्पादन करणारे राज्य आहे, त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि ओडिशा यांचा क्रमांक लागतो. मार्केटमध्ये येणाऱ्या लिंबाची आयात तब्बल 60 टक्केंनी घटल्याचे पुणे मार्केटमधील दलाल विलास भुजबळ यांनी सांगितले. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजानुसार, किमान पुढील पाच दिवस तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. तापमानात वाढ होणारच आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होणार आहे.


कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे फळधारणाच झाली नाही. ऐन उत्पादन पदरी पडणार तेवढ्यात निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरला. आतापर्यंत द्राक्ष, आंबा आणि आता लिंबूचे नुकसान सुरु झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयोग फोल ठरत आहेत. ढगाळ वातावरणामुळे फळधारणाच झाली नाही. परिणामी उत्पादन हे निम्म्यावर आले आहे.