Mango News : इतिहासात प्रथमच गुढी पाडव्याला आंब्याची आवक निम्म्याहून कमी झाली आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका आंब्याच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळं आंब्याची आवक घटल्याचे समोर येत आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला आंब्याची मोठी आवक एपीएमसी मार्केट मध्ये होत असते. मात्र, यंदा आवक कमी झाल्याने आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं आंबा खरेदीसाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.


दरवर्षी गुढी पाडव्याला 50 हजाराच्यावर हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होतात.  मात्र यावर्षी पहिल्यांदाच गुढीपाडव्याला केवळ 20 ते 22 हजार आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका आंबा उत्पादनाला बसला असून, यामुळं आंब्याचे दरही गगनाला भिडलेत. यंदा 2 हजार ते 5 हजार रुपयापर्यंत आंब्याच्या पेटीचा दर असून गतवर्षीपेक्षा 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशा दरात आंबा उपलब्ध होण्यासाठी अजूनही 20 ते 25 दिवसांची वाट पहावी लागणार आहे.


निसर्गाच्या लहरीपणावर यंदा आंब्याचा बहर राहिलेला आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरु होताच मोहर लागला परंतू, अवकाळी पावसामुळं आलेला मोहर फळाला आलाच नाही. परिणामी मोहर कुजला होता. त्यामुळं यंदा मार्चमध्ये मिळणारे उत्पादन हे शेतकऱ्यांच्या हातून निसटलेले आहे. याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेतील आवकही घटली आहे. बागायतदारांच्या मते 10 एप्रिलनंतर आंब्याची आवक ही वाढणार आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले आहे. उत्पादनात घट झाली तर दर हे वाढीव मिळतात. अवकाळीचा परिणाम केवळ उत्पादनावरच नाही तर आंब्याच्या दर्जावरही झाला आहे. त्यामुळं आंब्याचे देखील काही ठिकाणी घसरण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: