Farmer Success Stories : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना (Farmers) अनेकदा अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे अनेकदा हातात आलेलं पीक डोळ्यासमोर नाहीसे होतांना पाहण्याची वेळ येते. मात्र, सततच्या या पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करत यश गाठत आहे. असंच काहीसं औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील बाबासाहेब गोजरे या शेतकऱ्यांने करत लाखोंची कमाई सुरु केली आहे. पारंपरिक पिकांना बाजूला सारून गोजरे यांनी गुलाब फुलांची शेती (Rose Farming) केली आहे. त्यामध्ये त्यांनां यश आले असून, आज घडीला महिन्याकाठी ते गुलाबांच्या फुलांतून सव्वा लाखांची कमाई करत असल्याचा त्यांनी दावा केला आहे. 


पैठण तालुक्यातील वडजी शिवारात बाबासाहेब गोजरे यांना 12 एकर शेती असून, त्यापैकी त्यांनी सहा एकरमध्ये 1500 डाळिंबाच्या झाडाची लागवड केली आहे. तर, दोन एकरमध्ये मोंसबीची झाडे लावली आहे. उर्वरित क्षेत्रात गोजरे यांनी गुलाब व निशींगंधा फुलांची बाग फुलवली. ज्यात त्यांनी एकूण दोन हजार रोपं पुण्यावरून आणली. त्यापैकी जवळपास 700 रोपं हे ‘ग्लॅडिएटर’ जातीचे असून, रइतर डिवाईडर (शिर्डी गुलाब) म्हणुन ओळख असणाऱ्या गुलाबाची रोपं आहे. तर या फुलाच्या बागेला जगवण्यासाठी त्यांनी संपूर्ण रोपट्याला ठिबक सिंचनाची सोय केली आहे. याद्वारेच पाणी, खत फवारणीची व्यवस्था केली आहे. मागील दोन  वर्षांपासून गोजरे यांना दर महिन्याला जवळपास 1 लाख ते सव्वा लाख रुपये गुलाब फुलांच्या विक्रीतून मिळत आहे. ज्यात संध्या लाखो रुपय निव्वळ नफा शिल्लक राहतो, असे गोजरे यांनी म्हटले आहे. 


गुलाबाच्या बागेला नऊ महिने सतत फुल येतात. मात्र, या झाडांपासून ऑगस्ट ते मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सातत्याने चांगले फुल येतात. मार्चमध्ये उन्हाच्या झळांमुळे फुलांवर वाईट परिणाम होतो. मात्र सप्टेंबर ते फेब्रुवारी ही आठ महिने सतत फुल तोडणी करावी लागते. 






दिवसाआड किमान दोन हजार गुलाब फुल तोडली जाते


गोजरे हे गुलाबाची लागवड करण्यापूर्वी ज्वारी, सोयाबीन या परंपरागत पिकांची पेरणी करायचे. मात्र, दरवर्षी संकट यायचेच. त्यामुळे पेरणी मशागतीसाठी केलेलाही खर्च वसूल होत नव्हता. मात्र आता गुलाब शेतीमुळे आर्थिक फायदा झाला आहे. शिवाय पाच वर्ष अन्य काही पेरणीची गरज नाही. पंधराशे फुलझाडांपासून दर दिवसाआड किमान दोन हजार गुलाब फुल तोडली जाते. फुलांची विक्री करण्यासाठी औरंगाबाद शहरातील बाजारात पाठवण्यात येते. दोन रुपये फुलांप्रमाणे बाजारात भाव मिळतो. फुलांची तोडणी करण्यासाठी एक मजूर किंवा स्वत: तसेच कुटुंबातील सदस्य मदत करतात, असेही गोजरे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Farmers Day : राज्यात 30 ऑगस्ट हा दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा होणार, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचं स्मरण