Ravikant Tupkar : सोयाबीन ( Soybean) आणि कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात तुपकर यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर 22 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा 24 नोव्हेंबरला मुंबईला हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिली आहे. रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्या आहेत. त्यामुळं सरकारला आणखी आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. आता जीव गेला तरी मागे हटणार नसल्याचे तुपकर म्हणाले.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात रेकॉर्डब्रेक एल्गार मोर्चा निघाला होता. या मोर्चानं बुलढाण्यातील गर्दीचे आतापर्यंतचे सारेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सोयाबीनला साडेआठ हजार तर कापसाला साडेबारा हजार रुपये भाव द्यावा, आयात निर्यातीच्या धोरणात बदल करावा यासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी रविकांत तुपकरांनी सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. आठ दिवसानंतर  महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू असा इशारा तुपकरांनी  भाषणात दिला होता. दरम्यान, काल (16 नोव्हेंबर) रविकांत तुपकरांनी  आंदोलनाच्या पुढची टप्प्याची घोषणा केली आहे.


अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा


परतीच्या पावसानं सध्या रब्बीच्या पेरण्या लांबल्या आहेत. शेतकरी पेरणीची कामे करण्यात व्यस्त आहेत. याशिवाय खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पट्टयात आहे. शेतकऱ्यांच्या रब्बीच्या कामांवर व भारत जोडो यात्रेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून तुपकरांनी मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला आणखी आठ दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. मात्र, आठ दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही तर हजारो शेतकऱ्यांसोबत 24 नोव्हेंबरला मुंबईतील मंत्रालयाशेजारी असलेल्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याची घोषणा रविकांत तुपकरांनी केली आहे.


जीव गेला तरी मागे हटणार नाही, तुरकरांचा इशारा


येत्या 22 नोव्हेंबरपर्यंत सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा. अन्यथा 23 नोव्हेंबरला सोयाबीन, कापूस उत्पादक पट्टयातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे कूच करु, 24 नोव्हेंबरला गिरगाव चौपाटी परिसरातील मंत्रालयाशेजारी असलेल्या अरबी समुद्रात हजारो शेतकरी जलसमाधी घेतील असा इशारा तुपकरांनी दिला आहे. अतिवृष्टीने खचलेला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठयावर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत दररोज वाढ होत आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाचे काही देणे घेणे नाही. सरकारला आमचे मुडदेच हवे असतील तर आता सरकारच्या दारातच आमचे मुडदे पडतील, आता जीव गेला तरी मागे हटणार नाही असेही रविकांत तुपकरांनी म्हटले आहे.


 'या' आहेत मागण्या...


उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के या सूत्राप्रमाणे सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ हजार तर कापसाला दिड हजार रुपये भाव द्या.  सोयापेंड निर्यातीला प्रोत्साहन देऊन 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करा. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा.  खाद्यतेलावर 30 टक्के आयात शुल्क लावा. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या. चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करा. शेतकऱ्यांना रात्रीची नको तर दिवसा वीज द्या. शेतकऱ्यांना विमा सुरक्षा मिळाली पाहिजे. जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांना कंपाऊंड लावून द्या यासह इतर मागण्या रविकांत तुपकरांनी केल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उग्र आंदोलन करणार; रविकांत तुपकरांचा इशारा