Kisan Railway : मध्य रेल्वेने  शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी किसान रेल्वेची सुरुवात केली होती. मात्र, अचानक ही किसान रेल्वेची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हात किसान रेल्वे एका जागेवर जास्त वेळ थांबल्यास शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं, ही शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. किसान रेल्वे बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी मात्र विरोध केला आहे.


राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून विजेचे संकट निर्माण झाले आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे वीज टंचाई निर्माण झाली आहे. अशातच आता किसान रेल आणि मालगाड्या 13 एप्रिल पासून काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतूकीची गैरसोय झाली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरही त्याचा परिणाम होणार आहे. रेल्वे विभागाने घेतलेल्या अचानक निर्णयाचा परिणाम होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर दुसरीकडे किसान रेल अधिकचा वेळ एकाच थांबल्यास शेतीमालाचे नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगतिले जात आहे.


मध्य रेल्वेने किसान रेल्वे बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी मात्र विरोध केला आहे. रेल्वे सुरु न केल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. किसान रेल्वे 30 एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बंद केली आहे. ज्या रेल्वे लाइनवरून किसान रेल्वे जाते त्याच लाइनवरुन मालगाडीतून कोळशाची वाहतूक केली जाते. उन्हाळ्यामुळे किसान रेल्वे एका जागेवर जास्त वेळ थांबवल्यास शेतीमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मध्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरूपात किसान रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


शेतकऱ्यांची फळे, भाजीपाला यासह विविध पिकांना परराज्यातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी, उत्पादक शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळावे यासाठी किसान रेल्वेची सुरुवात करण्यात आली होती.
सांगोला येथून पहिली किसान रेल्वे सुरु करण्यात आली होती. कोरोना काळात ही किसान रेल्वे सुरु करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांचा डाळिंब, द्राक्ष, पपई, पेरु, सीताफळ, चिकू, शिमला, मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, शेवगा, आले, लिंबू असा शेतीमाल देशातील विविध राज्यांमध्ये कमी खर्चात वाहतूक होत होता.