Bhandara Agriculture News in Marathi : भंडाऱ्यातील शेतकरी आता पारंपरिक भात पिकाऐवजी आधुनिक पद्धतीनं शेती करून आर्थिक प्रगती साधत आहेत. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील मुंडीपार इथल्या चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी साधलेली प्रगती खरोखरचं वाखण्याजोगी आहे. टेंभुर्णे या अल्पभुधारक सुशिक्षीत बेरोजगारानं फळबागेत फुलविली मिश्रपिक शेतीतून त्यांनी केवळ 0.10 आर क्षेत्रात कारली पिकांची लागवड केली आणि त्यातून मोठी आर्थिक भरारी घेतली आहे.


भंडारा हा मुळात धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जातो. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे धान पीक घरात येण्याच्या आधीच नष्ट होऊन जाते. या पारंपारिक धान पीक जिल्ह्यात असूनही शेतीत नवीन प्रयोग करणारे अनेक तरुण शेतकरी सध्या आहेत. त्यासोबत नगदी पैसे देणारा भाजीपाला उत्पादनाचं अनेक नवीन प्रयोग जिल्ह्यात होत आहेत. त्यातच कारल्याची शेती करून भरघोस उत्पन्न कमावणारे चंद्रशेखर टेंभुर्णे यांची यशोगाथा ही नक्कीच प्रेरणादायी आहे. लाखनी तालुक्यातील मुंडीपार या गावातील चंद्रशेखर चुन्निलाल टेंभुर्णे यांच्याकडं केवळ अर्धा एकर शेती आहे. अत्यल्प शेतीतुन उदरनिर्वाह होणार नाही ही बाब लक्षात घेवून रोजगाराकरिता काही वर्षांपूर्वी त्यांनी नागपूर गाठलं. परंतु कोरोनामुळे त्यांच्या हाताचा रोजगार हिरावला आणि ते गावाकडं परतले. अशातच कृषी विभागाच्या संपर्कातुन आयोजीत क्षेत्रीय भेटीला गोंदीया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात गेले आणि आपलीही परिस्थिती आपल्याच हाताने घडवू हा ध्यास किंबहुना खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आणि स्वतःच्या शेतीत बागायती शेती करायची ही खूणगाठ मनात बांधून त्यांनी शेतात बोअरवेलच्या माध्यमातुन सिंचन सुविधा निर्माण केली.


तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांनी अर्ध्या एकरात आंबा फळबाग लागवड केली. जुलै 2022 मध्ये 0.20 हेक्टर आर. क्षेत्रात आंबा कलमांची अनुदानीत 80 झाडे व अतिघन लागवड करण्याचे दृष्टीने अधिकची 70 झाडे अशी एकूण 150 झाडे 16 फुट X 5.5 फुट अंतर पध्दतीने लावली. यामुळे त्यांना कमी क्षेत्रात जास्त फळे उत्पादन मिळणार असल्याची त्यांची अपेक्षा आहे. आंबा फळपिक व भाजीपाला पिकाला ठिबक सिंचन बसविले. त्याकरीता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ त्यांनी घेतला आहे. प्रथमच आंबा फळ पिकात आंतरपिक म्हणून 0.10 हे. क्षेत्रावर कारली पिकाची थंडीच्या कालावधीत (गैर हंगामात) डिसेंबर 2022 मध्ये लागवड केली. त्याकरीता क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचा वापर केला. पिकाची जोमाने वाढ झाली व औषध फवारणीच्या खर्चात बचत झाली. सुरुवातीच्या 45 दिवसाच्या कालावधीत बिना फवारणीनं किड व रोगापासुन संरक्षण मिळाले. 15 मार्च 2022 अखेर त्यांना 2 टन उत्पादन व सरासरी 35 रुपये प्रति किलो एवढा दर मिळालेला असून आतपर्यंत 70 हजार रूपये एवढे उत्पादन मिळाले. अजुन वाढीव 3 टन उत्पन्न मिळणार असुन निश्चितपणे 0.10 हे. क्षेत्रातुन रुपये 1 लाखांचे निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे.


आजच्या युवा पिढीनं निराश न होता तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायीक दृष्टीकोनातून भाजीपाला व फळशेतीसाठी पुढाकार घेतल्यास नोकरीसाठी कुणाकडं हात पसरण्याची गरज राहणार नाही, हे चंद्रशेखर यांनी दाखवून दिलं आहे.  


शेती - अर्धा एकर (0.20 हेक्टर आर)


लागवड - आंबा, कारली


अर्धा एकरात आंबा आणि त्यात आंतरपीक म्हणून कारली


कारली - 0.10 आर क्षेत्रात


कारली पिकासाठी आतापर्यंत 50 हजार रुपयांचा खर्च आला असून पुढील दिवसात आणखी 20 हजार खर्च अपेक्षित आहेत. आतापर्यंत 2 टन कारली तोडली असून त्याला 35 रुपये किलो असा दर मिळाला असल्यानं 2 टनापासून 70 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. कारली आणखी निघणार असून येत्या दोन ते तीन दिवसाआड पुढील दिवसात 20 वेळा कारली तोडली जाणार असून त्यातून पुढे काय दर राहील यावर अपेक्षित आहे. मात्र, अंदाजे 1 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. अर्धा एकरातील केवळ 0.10 आर क्षेत्रात आंतरपीकात कारली लागवड केली असून त्यावर एकूण खर्च प्रथम 50 हजार आणि नंतर 20 हजार असा 70 हजारांचा.... यातून प्रथम 70 हजारांचे उत्पन्न मिळाले. उर्वरित कालावधीत 1 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सर्व खर्च 70 हजार आणि त्यातून निव्वळ नफा 1 लाख 20 हजारांचा अपेक्षित आहे.