Fisheries : सहकाराच्या माध्यमातून (cooperative sector) मत्स्यव्यवसाय क्षेत्राला (Fisheries) बळकटी देणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचे वक्तव्य केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Minister Parshottam Rupala) यांनी केलं. सागर परिक्रमा हे केवळ किनारपट्टीलगत राहणाऱ्या समुदायांचे म्हणणे ऐकण्यासाठीच नाही तर आपल्या देशाच्या किनारपट्टीवरील संपत्तीबद्दल जाणून घेण्याचे देखील एक माध्यम आहे. सागर परिक्रमेच्या तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील सातपाटी, वसई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील बंदरांचा समावेश असल्याचे रुपाला म्हणाले.


मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त 'सागर परिक्रमा' कार्यक्रम सुरू केला आहे. सागर परिक्रमेचा तिसरा टप्पा 19 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू होता. मुंबईतील ससून डॉक येथे त्याचा समारोप  झाला. त्यावेळी रुपाला बोलत होते. 


मच्छीमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे किसान क्रेडिट कार्डचा लाभ


सरकारनं मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आता स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा दिला आहे. या क्षेत्रात 20  हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या दृष्टीकोनातून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय संबंधी पायाभूत सुविधा मजबूत करण्यात आल्या असल्याचे रुपाला म्हणाले. सहकार क्षेत्रालाही स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला असून, आता सहकाराच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच मच्छीमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतो. मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आल्यामुळं किनारपट्टीवरील समुदायांचे आर्थिक उत्थान होईल असं ते म्हणाले.


मच्छिमार आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांशी समस्या सोडवण्याला प्राधान्य


सागर परिक्रमा टप्पा III ला सातपाटी येथून प्रारंभ झाला आहे.  जिथे आता एका योजनेद्वारे एक नवीन जेट्टी  विकसित केली जाणार आहे. त्यासाठी आम्ही 2 हजार 60 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मच्छिमार आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी मांडलेल्या समस्या सोडवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सागर परिक्रमा हे केवळ किनारपट्टीलगत राहणाऱ्या समुदायांचे म्हणणे ऐकण्यासाठीच नाही तर आपल्या देशाच्या किनारपट्टीवरील संपत्तीबद्दल जाणून घेण्याचे देखील एक माध्यम असल्याचे रुपाला म्हणाले. 


सागर परिक्रमा  टप्पा III च्या माध्यमातून केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेमुळं राज्य सरकार विविध समस्या सोडवू शकेल. किनारपट्टीवरील  समुदायांसाठी अधिक  सुविधा प्रदान करेल. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्र्यांनी पुढाकार घेऊन किनारपट्टीवरील समुदायांशी संवाद साधल्याबद्दल महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार   यांनी त्यांचे आभार मानले.


महत्त्वाच्या बातम्या:


Cage fish farming | मत्स्यपालन व्यवसायात नगरच्या तरुणांची भरारी, थेट दक्षिण आफ्रिकेत माशांची निर्यात