Agriculture News : राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना  'रासायनिक आणि सेंद्रीय खते (Fertilizers) दिली जाणार आहेत. सन 2023-24 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या बाबीऐवजी 'रासायनिक आणि सेंद्रीय खते देणे ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांनी दिली. 


खते देणे ही बाब समाविष्ट 


भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिताचे अनुदान केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय योजना प्रति थेंब अधिक पिक या योजनेतून अदा करण्यात येत होते. तसेच शेतकऱ्यांना इतर योजनांमधून ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्यानं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणं या बाबी ऐवजी आता खते देणे ही बाब समाविष्ट करण्यात आली आहे. सुधारित केलेल्या या मापदंडांना मंजूरी देण्याचा  निर्णय आज घेण्यात आला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात आली आहे. यापुढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसून आल्यास लाभार्थीना देय असणारे अनुदान तीन वर्षांत 50:30:20 या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मंत्री भुमरे यांनी दिली.


अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद


राज्याचे माजी कृषीमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर (Bhausaheb Fundkar) यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळं आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार  आहे. यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


या योजनेची उद्दिष्टे


भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेच्या माध्यमातून पीक आणि पशुधन याबरोबरच फळबागेच्या रुपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास आणि उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे हे उद्दीष्ट आहे. 



योजनेत समाविष्ट पिके


आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर.


नाविन्यपूर्ण बाबी


• फक्त कलमांद्वारे लागवड (अपवाद नारळ रोपे)


• घन लागवडीचा समावेश


• ठिबक सिंचन अनिवार्य


• शेतकऱ्यांचा सहभाग