Agriculture News : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील लांजा येथील मिथिलेश देसाई (Mithilesh Desai) यांची फणस किंग म्हणून ओळख आहे. त्यांच्या जॅक फ्रुट ऑफ इंडिया या कंपनीचा लंडनमधील (London) सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब (CIH)या कंपनीसोबत सर्क्युलर इकॉनॉमी इकोसिस्टमला चालना देण्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार झाला आहे. याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील एक हजाराहून अधिक शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. भारतामध्ये वर्तुळाकार अर्थव्यवस्था इकोसिस्टम विकसित करण्याच्या उद्देशाने हा करार झाला आहे. 


 जगभरातील 86 वैविध्यपूर्ण फणस वाणांची देसाईंनी केली जोपासणा


'भारताचा जॅकफ्रूट किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिथिलेश देसाई यांच्यावर भारतासाठी CIH च्या ब्रँड अॅम्बेसेडर (राजदूत) ची जबाबदारी ह्या कराराद्वारे देण्यात आली आहे. त्यांनी शाश्वत कृषी पद्धतींना चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवन उन्नत करण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा केली आहे. मिथिलेश देसाई यांनी जगभरातील 86 वैविध्यपूर्ण फणस वाणांचे जोपासणा केली आहे. त्यांच्या या विलक्षण कामगिरीमुळं त्यांना जागतिक मान्यता मिळाली आहे. त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेला 'कृषी गौरव पुरस्कार', फळबाग लागवड आणि शाश्वत शेती या क्षेत्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करते.


 



शेतकऱ्यांच्या कल्याणासोबतच पर्यावरणीय समतोल राखणार


भारतातील ग्रामीण शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांची मला जाणीव आहे. आम्ही भारतीय शेतकरी केवळ ऑनलाइन माध्यमांद्वारे आणि भागीदारीद्वारे शेतीतील तंत्रज्ञानाची ओळख करुन देतो. CIH आता आमच्या पद्धतींमध्ये त्याच्या अंमलबजावणीची संधी आणेल असे मत मिथिलेश देसाई यांनी व्यक्त केले. CIH च्या सहकार्याने आम्ही पंचवार्षिक योजना तयार केली आहे. ज्यामध्ये पीक उत्पादन वाढवणे आणि पुनर्वापरातून फ्लेक्स-इंधन किंवा जैव-इंधन तयार करणे समाविष्ट आहे. आमच्या आकांक्षा विस्तारित आहेत. शाश्वत शेतीच्या पलीकडे ते सर्वांगीण कल्याण आणि पर्यावरणीय समतोल समाविष्ट करतात. 


शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न 


CIH आणि मिथिलेश देसाई यांच्यातील भागीदारी महाराष्ट्रापासून सुरुवात करुन अनेक भारतीय राज्यांमधील कृषी पद्धतींमध्ये बदल घडवून आणेल. वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांच्या सहकार्याने काजू, आंबा आणि बहु-फळ-भाजीपाला लागवड आणि प्रक्रिया अशा परिवर्तनशील उपक्रमांना चालना देण्याचा मानस आहे. शेतकरी समुदायांचे कल्याण आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो. या सामंजस्य कराराचे वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरीमध्ये स्थानिकीकृत हबची स्थापना करणे. कृषी अवशेषांपासून बनवलेल्या इथेनॉलच्या अग्रगण्य उत्पादनासाठी समर्पित आहे. जागतिक हवामानातील लवचिकता, शाश्वत जैवइंधन पर्यायांच्या शोधात भारताच्या पाठपुराव्याला एकाच वेळी पुढे नेण्याचा मानस आहे.


शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणार


मिथिलेश देसाई यांच्यासोबतची आमची भागीदारी भारतात कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी फायद्याची ठरेल. ही भागीदारी दोन्ही देशात एक सेतू म्हणून काम करेल असे मत सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हबचे संस्थापक जोएल मायकल यांनी व्यक्त केले. शेतकर्‍यांना जागतिक कृषी प्रगतीशी जोडण्यात मदत होणार आहे. वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या मॉडेल्सचा उपयोग करून, आम्ही शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जोएल मायकल यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या:


यवतमाळमधील शेतकऱ्याने फणस शेतीतून साधलीय आर्थिक उन्नती, 30 झाडांमधून दरवर्षी सव्वा लाखाचं उत्पन्न