Agriculture news : जंगलासह ग्रामीण भागातील शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात. या भाज्यांची कोणीही लागवड करत नाही, या भाज्या आपोआपच येतात. कुणी त्याची स्वतःहून लागवड करत नाही. त्यासाठी कुणी खत देखील घालत नाह. त्यामुळं या रानभाज्यांकडं रानमेवा म्हणून पाहिले जाते. अशाच रानमेवा म्हणून ओळखली जाणाऱ्या करटूल्याच्या भाजी लागवडीचा प्रयोग अकोला जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्यानं केला आहे. दहा गुंठ्यात या शेतकऱ्याला चांगल उत्पन्न देखील मिळालं आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा. 


अकोला शहरापासून पंचवीस किमी अंतरावर असलेलं पारस गावातील शेतकरी श्रीकृष्ण पांडुरंग लांडे आणि  संगिता लांडे यांनी करटुल्याच्या भाजीचा प्रयोग केला आहे. दोन महिन्यात तब्बल 250 क्विंटलहून अधिक शेतमालाल निघला असून त्यातून चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळालं आहे. करटुल्याची भाजीचा धाडसी प्रयोग करणारे हे पहिलेच शेतकरी ठरले आहेत.


पारंपारिक पिकातून बसला फटका 


श्रीकृष्ण लांडे यांच्याकडं पाच एकर शेती आहे. लांडे पारंपरिक पिके घेतात, मात्र त्यातून हवे तसे उत्पन्न त्यांना लाभत नाही. आता पारंपरिक शेतीसह काहीतरी नवीन धाडस करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि तो यशस्वी झाला. युट्युबवरुन आणि कृषी विभागाच्या आत्म्यानं केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतात पाच गुंठ्यात रानातील मेवा म्हणून ओळखलं जाणारं करटूल्याची भाजीची लागवड केली. त्यावेळी त्यांना चांगलं उत्पन्न झालं होतं. म्हणून या वर्षी देखील त्यांनी करटूल्यांचे लागवड क्षेत्र वाढवलं असून ते दहा गुंठ्यांपर्यंत पोहोचवलं आहे.  


युट्यूब आणि कृषी विभागाचं मार्गदर्शन


कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार लांडे यांनी शेतात करटूल्याची लागवड करण्यासाठी वेलीचा संगोपन म्हणजेच वाढ कशी करता येईल याची काळजी घेतली. सुरुवातीला त्यांनी शेतात चाळीस फूट अंतरावर सिमेंटचे खांब गाडले. त्यानंतर त्यांना तार बांधून झिक-झ्याकं जाळे बांधण्यात आले. यासाठी त्यांना वीस हजार रुपये इतका खर्च लागला. प्रति 16 हजार रूपये किलोप्रमाणे जालण्यावरुन दोन किलो करटुल्याचं बियाणे आणलं. मे महिन्यात करटुल्याची लागवड केली. जूनच्या अखेरपर्यंत त्यांना पीक यायला सुरुवात झालं. सुरुवातीला तीन ते चार दिवसाआड त्यांनी तोडा सुरू केला. पहिल्या तोड्यात त्यांना 25 ते 30 किलो इतकx पिक मिळालं, त्यावेळी त्याचा भाव 250 ते 300 प्रतिकिलो प्रमाणे होता. साधारणता करटूल्याचे पिके दोन महिने राहत असून त्यांना दोन महिन्यात जवळपास 250 अधिक उत्पन्न मिळालं. सद्यस्थितीत त्यांच्या करटूल्याला 200 रुपयांपर्यतचा भाव भेटत आहे. 


रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला नाही


लांडे यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला नाही. सुरुवातीला फक्त शेणखताचा वापर केला. त्यानंतर कुठल्याच खताचा वापर केला नाही. दरम्यान, करटुल्याची लागवड केल्यानंतर त्याला जमीनीत कंद तयार होतात. ते कंद वर्षानुवर्षे जमिनीमध्ये राहतात. त्यामुळं दरवर्षी लागवड करण्याची झंझट नाही. त्यामुळं बियाण्यांचा खर्चही वाचत आहे. श्रीकृष्ण आणि संगीता या दोघांनी अवघ्या दहा गुंठ्यामध्ये रानभाजी असलेल्या करटुल्याची शेती केली आहे. करटुले हे रानभाजी आहे. डोंगरदऱ्या, घनदाट झुडपांमध्ये करटुल्याचे वेल दिसून येतात. मात्र, करटुल्याची लागवड सुपीक जमिनीत करण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच धाडसी प्रयोग या शेतकरी दामत्यानं केला आहे. 


25 ते 30 किलोचा एक-एक तोडा काढला की स्वतःच आसपास गावात त्याची विक्री करायचे. सुरूवातीला 80 ते 100 रुपये पाव भाव मिळाला. नंतरचे तोडे सरासरी 200 रूपये किलोने विकले गेले. ही शेती करताना त्यांना कृषी विभागाने मोठी मदत केली आहे.


 काय आहेत करटूल्याचे विशेष गुणधर्म? 


१) करटूल्यांमध्ये जीवनसत्त्व 'अ' मोठ्या प्रमाणात असतंय. जे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर राहते.
२) या भाजीतील रस पिंपल्स आणि एक्झिमा ठीक करण्यासाठी वापरला जातो. करटूल्याच्या बिया भाजून खाण्याचा सल्ला देखील तज्ज्ञ देतात. 
३) करटूल्यांमध्ये फ्लेव्होनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ‘ही’ भाजी शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते. 
४) शरीराची शक्ती वाढवणाऱ्या एका आयुर्वेदिक भाजीची चर्चा आहे. ही भाजी शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते, फायदे निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. त्यासाठी दैनंदिन आयुष्यातील सवयींमध्ये बदल करुन खाण्यापिण्याची पथ्य आणि व्यायामही महत्त्वाचा असतो. 
५) डोकेदुखी, केस गळती, कान दुखणे, खोकणे, पोटात इंफेक्शन, मुळव्याध, डायबिटीज, खरुच, अर्धांगवायू, ताप, सूज, बेशुद्ध पडणे, सापाने दंश करणे, डोळ्यांच्या व्याधी, कँसर, ब्लड प्रेशर सारख्या अनेक आजारांवर या भाजीचा चांगला परिणाम होतो.