'उलगुलान' म्हणजे नक्की काय? | मुंबई | एबीपी माझा
मुंबईच्या आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आदिवासी, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'उलगुलान मोर्चा'ची अखेर राज्यसरकारने दखल घेतली आहे. पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचं लेखी आश्वासन सरकारनं मोर्चेकऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारत लाँगमार्च काढला होता. या मोर्चात आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरीही सहभागी झाले होते. हजारोच्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाल्याने विधानसभेतही याचे पडसाद उमटले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाची दखल घेत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केलं.