26/11 हल्लातील मुख्य तपास अधिकारी रमेश महालेंशी खास बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
२६ नोव्हेंबर २००८. मुंबई आणि देशासाठी काळादिवस. पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला आणि आपल्या देशांचं कधीही भरून येणार नाही इतकं नुकसान झालं. १० अतिरेक्यांनी जवळपास ६० तास मुंबईला वेठिस धरलं. या हल्ल्यात १८ पोलिस शहीद झाले. ३४ परदेशी नागरिकांसह १९७ नागरिकांचा मृत्यू झाला तर ८०० जण जखमी झाले. मुंबईची शान मानली जाणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस या ठिकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. या अमानुष हल्ल्याने अख्खं जग हादरलं. आपल्या देशावर झालेला तो आजवरचा सर्वात मोठा हल्ला होता. किंबहुना भारताविरोधात पुकारलेलं ते युद्धच होतं.
या हल्ल्यातून मुंबई आणि मुंबईकरांना वाचवण्यासाठी मुंबई पोलिस दल, अग्निशमन दल, NSG चे कमांडोज आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या हल्लेखारांमधल्या अजमल आमिर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालं. या घटनेला १० वर्षे उलटली तरी जखमा आजही ताज्या आहेत. याच गुन्ह्याचा तपास आणि अतिरेक्यांपैकी एकमेव जिवंत हाती लागलेल्या कसाबला फासावर चढविण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली ती वरिष्ठ तपास अधिकारी रमेश महाले यांनी. या हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत असताना रमेश महाले यांचं '२६/११ मी आणि कसाब' हे पुस्तकही प्रकाशित होतंय. त्या काळरात्रीच्या आठवणी, कसाबला पकडण्यापासून ते तपासातली आव्हानं,
या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आज रमेश महाले आपल्यासोबत आहेत.