Chhagan Bhujbal : निर्दोष मुक्त झाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, विनम्रपणे निकाल स्वीकारतो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. आज मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या खोटे नाटे आरोप झाले. आमच्यावर मीडिया ट्रायल झाली. सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावं लागलं. या प्रकरणात एका पैशाचाही घोटाळा झाला नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही कोर्टात सांगितलं. आज आम्हाला त्या केसमधून निर्दोष मुक्त केलं आहे, असं भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले की, EDची केस या प्रकरणावरुन बांधली गेली आहे. काही लोकांनी त्रासच द्यायचं ठरवलं होतं. आम्ही त्याचवेळी म्हटलं होतं, की सत्य परेशान होता है, पराजित नहीं. आम्ही विनम्रपणे हा निकाल स्वीकार करत आहोत. आमची कुणावरही तक्रार नाही. नियती कधी कधी दिवस आणते, ते भोगावे लागतात. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं या कटकारस्थानातून आम्ही मुक्त होत आहोत, असं ते म्हणाले. माझ्यावर पक्षानं, शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असंही भुजबळ म्हणाले.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असं कोर्टानं आज निर्णय देताना म्हटलं आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.