Kannad घाटात 3 ठिकाणी कोसळल्या दरडी, पावसामुळे मार्गावर वाहतूक कोंडीमुळे अनेकांचे हाल : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChalisgaon Rain Update : जळगावातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळं हाहाकार माजला आहे. जवळपास 800 जनावरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाच ते सात लोकंही वाहून गेल्याची भिती आहे. चाळीसगाव तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव शहर आणि ग्रामीण भागात पहाटे पावसाची कोसळधार पाहायला मिळाली. तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आला. या पुराचं पाणी जवळपास 15 गावांमध्ये शिरलं आहे. मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जळगावातील पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचं पाणी मात्र अद्याप ओसरलेलं नाही. या पुराच्या पाण्यात जवळपास 800 जनावरं वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच 5 ते 7 नागरिकही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक आमदार मंगशे चव्हाण यांनी दिली. चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहने अडकून पडल्याने त्यांना मोठ्या अडचणी ना समोर जावे लागत आहे,एक ट्रक दरीत कोसळत त्यात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार मंगेश चाव्हण यांनी दिली आहे. तालुक्यातील पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि एकमेकांना सहकार्य करावं, असं आवाहन मंगेश चव्हाण यांनी केलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे तितुर आणि डोंगरी नदीच्या पुराच पाणी पंधरा गावात शिरल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातील अनेक गावांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणत पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणी सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतूकीसाठी बंद आहे, तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करु नये, औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा, तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.