Suresh Dhas PC : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत धसांचं मोठं वक्तव्य
अहिल्यानगर : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण व खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडमुळे सध्या बीड (Beed) जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच, महायुतीमधील भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडेंविरुद्ध आरोपींचे गौप्यस्फोट करत राजकीय धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर जात आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते बीड दौऱ्यावर असून आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी त्यांच्या कार्यक्रमाबाबतची माहिती दिली. तसेच, या बैठकीला बीड जिल्ह्यातील दोन्ही मंत्री उपस्थित राहणार का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं, तर मुंडे बंधु-भगिनींबाबत मोठं वक्तव्य केलं.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात जनतेतील कार्यक्रमाला येत आहेत. खुंटेफळ धरणाच्या बोगद्याच्या प्रकल्पाच्या कामाच्या शुभारंभासाठी ते येणार असून 1.68 टीएमसी पाणी येथील शेतकऱ्यांना मिळणार आहे. सन 2005-06 पासून ही योजना माझ्या डोक्यात होती. या प्रकल्पामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास 27 हजार 500 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्ह्यात जोरदार स्वागत करणार असून 65 हजार लोक या कार्यक्रमाला येणार आहेत, अशी माहिती आमदार धस यांनी दिली. मात्र, जिल्ह्यातील दोन मंत्री मुंडे बंधु-भगिनींबाबतच्या वक्तव्यावर त्यांनी मोठं वक्तव्य केलं. जिल्ह्यातील मंत्री आणण्याची आमची क्षमता नाही, पण जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांची नावं पत्रिकेवर आहेत, असे सुरेश धस यांनी म्हटलं. या कार्यक्रमानंतर मच्छिंद्रनाथाच्या समाधीवर मुख्यमंत्री दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी, 10 कोटी रुपयांच्या गाभाऱ्याचा शुभारंभ करणार आहेत, असेही धस यांनी म्हटले.