Ratnagiri Refinery : रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला, नवीन जागेवरुन विरोधक आणखी आक्रमक
रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरीचा मुद्दा मागील तीन ते चार वर्षापासून गाजतोय. पण, नाणार ऐवजी राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगांवचा मुद्दा चर्चेत आला आणि याबाबतच्या घडामोडी वेगानं घडत आहेत. दरम्यान, रिफायनरी विरोधकांनी आपला विरोध आणखी तीव्र केला असून गावागावात तसे फलक लावले गेले आहेत. या फलकावर आमचे गाव कट्टर रिफायनरी विरोधी आहे. 'रिफायनरी समर्थनार्थ जमीन दलाल, राजकीय नेते वा अन्य कुणीही प्रचार करण्यास येऊ नये. कोणी जबरदस्तीनं आल्यास त्या कृतीस ती व्यक्ती सर्वस्वी स्वत: जबाबदार असेल' असा सुचना वजा इशारा देणारा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रिफायनरी या विषयावरून कोकणातील वातावरण आणखी गरमागरमीचं होणार आहे.