शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका;खतांच्या वाढलेल्या किंमतीवरुन शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने तो दुहेरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र लिहलं आहे. या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची आणि किंमतीतील वाढ लवकर मागे घेण्याची विनंती, पवार यांनी मंत्र्यांना केली आहे.
कोरोना महामारीमुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम समाजातील अनेक घटकांवर झाला आहे. लॉकडाऊनमुळे शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकरीही अडचणीत आहे. अशाच परिस्थितीत केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी शरद पवार यांनी रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. इंधनाच्या वाढीव दरासोबत आता नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. हा निर्णय अत्यंत धक्कादायक असून याचे त्वरित पुनरावलोकन करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.