Girish Mahajan : राज्यभरात मुसळधार पाऊस, गिरीश महाजनांकडून परिस्थितीचा आढावा
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईसह राज्यातील पावसाचा आढावा घेतला. नांदेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला असून, मुखेड तालुक्यात चार ते पाच लोक बेपत्ता आहेत. इथे सैन्यदलातर्फे बचाव कार्य सुरू आहे. गरज पडल्यास नांदेडला भेट देणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाच-सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी आहे. रात्री समुद्राला भरती असली तरी ती फार मोठी नसल्याने परिस्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा आहे. नांदेडमध्ये पाऊस थोडा कमी झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर सुरू आहे. प्रशासनाने आज आणि उद्या या दोन्ही तालुक्यांमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, "पावसाचा अंदाज घ्या विनाकारण घराबाहेर पडू नका तसेच ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असेल त्या ठिकाणावरुन जाण्याचा प्रयत्न करू नका." अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.