Eknath Shinde Majha Vision| खुर्चीसाठी भानगड नाहीच, तिघांची गाडी एकच,सत्ताधारी विरोधक रथाची दोन चाकं
Eknath Shinde Majha Vision| खुर्चीसाठी भानगड नाहीच, तिघांची गाडी एकच,सत्ताधारी विरोधक रथाची दोन चाकं
महायुती सरकारच्या काळात सुरू झालेल्या राज्यातील कुठल्याही योजना बंद करण्यात आल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना आजही सुरू आहेत. शिवभोजन थाळी असेल, आनंदाचा शिधा असेल किंवा लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) असेल ह्या योजना आजही सुरू आहेत, यापुढे देखील सुरूच राहतील, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे. राज्यातील एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असा शब्दच एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिला. एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, उद्योग, मुंबईचा विकास, रोजगार, गावाकडची शेती, मुख्यमंत्रीपदावरुन नाराजी, शासनाच्या योजना, नागपूरचा हिंसाचार... या प्रश्नांवर उत्तरे दिली. तसेच, राज्यातील महायुती सरकार हे फेव्हिकॉल का जो है.. अजिबात तुटणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
आपण महायुतीमध्ये नाराज आहेत का, सातत्याने गावाकडे जाता याबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मी गावी जातोच. पण, काहीजण म्हणतात मी हेलिकॉप्टरने शेती करतो. कारने गावी जायला 6 ते 7 तास लागतात. या 6 ते 7 तासांत मी 10 हजार सह्या करु शकतो, सह्या करण्यात माझा रेकॉर्ड आहे. गर्दीमध्ये माणसांच्या पाठीवरही मी कागद धरुन सही करतो, या सहीने लोकांचे कामं करतो, वैद्यकीय विषय असेल किंवा इतर कामासाठी मी सह्या करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले. मी गावाकडे शेती चांगलीच फुलवली आहे, गावात बांबूची शेतीही मी केली आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाकडील शेतीचा अनुभव सांगितला. तसेच, 30 जून 2022 मी.. असे म्हणत एकनाथ शिंदेंनी आपण 2022 मध्येही राजकीय बांबू लावल्याचे सूचवले.