Sanjay Raut : राष्ट्रीय स्तरावरही लवकरच आघाडी स्थापन होणार : खासदार संजय राऊत

मुंबई : महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय स्तरावरही अशा आघाडीची गरज आहे. या विषयावर शरद पवारांशी चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच त्यासाठी हालचाली सुरु होईल असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. पण देशात काँग्रेस शिवाय इतर कोणतीही आघाडी निर्माण होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

पश्चिम बंगालमध्ये ममतांनी जी मुसंडी मारली ती जबरदस्त आहे. पण भविष्यात देशात अशी आघाडी निर्माण व्हावी, ही सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा हा कांग्रेस पक्ष आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले

खासदार संजय राऊत म्हणाले की, "कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्रातील स्थिती आता सर्वात चांगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चांगलं काम करत आहे. इतर राज्यांत ही स्थिती दिसत नाही. इतर राज्यात पाहिले तर स्मशानभूमीसमोर प्रेतांच्या रांगा लागल्याचं दिसतंय."

देवंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. आरोप करणे त्यांचं काम आहे. राज्य सरकारचे कार्य चांगले नसल्याचा त्यांनी आरोप केला होता. पण त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल उत्तर दिलं आहे. कोरोना काळात महाराष्ट्राने चांगलं काम केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते."

मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फडणवीस यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola