Rain Coats for Varkari | मुख्यमंत्र्यांच्या वतीने वारकऱ्यांना पाच लाख रेनकोटचं वाटप | नाशिक | ABP Majha
आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आज हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. वारकऱ्यांनी अवघे 10 ते 15 किलोमीटर पार केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. परंतु अवघ्या काही वेळात वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. रेनकोट पाहून वारकऱ्यांना सुखद धक्का बसला. दरम्यान यावर्षी विविध पालख्यांद्वारे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना 5 लाख रेनकोटचे वाटप केले जाणार असल्याची माहिती स्वयंसेवकांनी दिली. दरवर्षी आषाढी वारीसाठी वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे धाव घेतात. परंतु आषाढ महिन्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असतो. त्यामुळे वारकऱ्यांना भर पावसात मार्गक्रमण करावे लागते. या वारीत सहभागी होणारे बहुतांश वारकरी हे शेतकरी, कामगार तसेच मजूर वर्गातील असतात. त्यामुळे बहुतांश वारकऱ्यांना पावसापासून वाचण्यासाठी छत्री किंवा रेनकोट खरेदी करणे परवडणारे नसते. त्यामुळे यावर्षी सरकारने वारकऱ्यांना रेनकोट देण्याता निर्णय घेतला आहे.