Lunch Break | 'लंच ब्रेक'च्या नावे चालढकल करणाऱ्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दणका | मुंबई | ABP Majha
मंत्रालयात दुपारच्या वेळेत गेल्यावर ताटकळत राहावं लागणाऱ्या सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मंत्रालयात असलेल्या कामचुकार शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने जोरदार दणका दिला आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी दुपारी 1 ते 2 दरम्यान जेवणासाठी फक्त अर्धाच तासाचा वेळ देण्यात आला आहे, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. आश्चर्य म्हणजे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हा निरोप देण्यासाठी जीआर काढण्याची वेळ सरकारवर आली आहे. एका शाखेतील सर्व कर्मचारी एकाच वेळी जेवायला जाणार नाहीत, असंही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. लंच टाईम हा एक तासाचा असला, तरी प्रत्येक कर्मचाऱ्याला अर्ध्या तासाच्या आत जेवण उरकून आपल्या जागेवर परतावं लागणार आहे.