VIDEO | कशाला हवी बुरखा बंदी? | माझा विशेष | एबीपी माझा
बुरखाबंदी हा आपल्या देशात चर्चिला गेलेला काही नवा विषय नाही. अनेकदा उघडपणे तर काही वेळा दबक्या आवाजात बुरखाबंदीची मागणी होत राहिलेली आहे. या आवाजात आज आणखी एक आवाज मिसळला तो होता सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचा. आज सामन्याच्या अग्रलेखात श्रीलंकेच्या धर्तीवर भारतातही बुरखाबंदी करावी, तिहेरी तलाकप्रमाणे यासंदर्भातलाही निर्णय घ्यावा, असं अग्रलेखात लिहिण्यात आलंय. शिवाय यासाठी मोदींना सर्जिकल स्ट्राईक करण्याइतकं धाडस लागेलं असं म्हणत डिवचण्यातही आलंय. मात्र या अग्रलेखावरून शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. बुरखाबंदीची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असं स्पष्टीकरण देत शिवसेनेने स्वतःला यापासून वेगळं करून घेतलंय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बुरखाबंदी आपल्याला खरंच हवी आहे का, हा प्रश्न उभा राहतोय. अनेक जण राष्ट्रीय हिताशी याला जोडत आहेत. पाकिस्तान अफगाणिस्तान, कोंगो यासारख्या देशात बुरखा घालून आलेल्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवत सामान्यांचे जीव घेतले आहेत. मग या सगळ्यात देशाचं हित आणि धार्मिक भावना या दोन्ही गोष्टी सांभाळत काही सुवर्णमध्य निघेल का याविषी आज चर्चा करायची आहे.