एकरकमी परतफेड योजनेवर शेतकरी नाखूश | 712 | बीड | एबीपी माझा
राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केल्यानंतर त्यातच ओटीएस ही नवी योजनाही जाहीर केली होती. ओटीएस ही एकरकमी परतफेड योजना आहे. या योजनेमुळे शेतकरी नाखूश झाल्याचं दिसून येतंय. या योजनेमध्ये दीड लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं दीड लाखांचं कर्ज माफ केलं जाणार होतं. त्यावरची रक्कम शेतकऱ्यांना भरायची होती. त्यानुसार दीड लाखांच्या वरची रक्कम अदा केल्यानंतरही शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी मिळाली नसल्याचं दिसून येतंय. ३१ डिसेंबरला ही योजना बंद होणारेय. तेव्हा कर्जमाफीची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्याच्या खात्यात आल्याशिवाय ही योजना बंद करु नये अशी मागणी केली जातेय. सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे ओटीएसमध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जातेय.