नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनाच विचारा सरकार कसं बनवणार, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या तिढ्याविषयी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


संसदेचं हिवाळी अधिवेशन आणि सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी शरद पवार आज दिल्लीत पोहोचले. महाराष्ट्रात महाशिवआघाडी म्हणजे शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं समीकरण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज सोनिया गांधींची भेट घेऊन चर्चा करतील. परंतु त्याआधी शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सगळे बुचकळ्यात पडले आहे.

'सरकार कसं बनणार भाजप-शिवसेनेला विचारा'
शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची किती शक्यता आहे, याविषयी शरद पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, "भाजप आणि शिवसेनेला विचारा, दोघे सोबत होते. शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढले होते. आम्ही त्यांच्यासोबत लढलो नव्हतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले होते." राष्ट्रवादी शिवसेनेसोबत मिळून सरकार बनवणार असल्याची चर्चा आहे, असं विचारलं असता त्यांनी केवळ 'अच्छा' म्हणून उत्तर टाळलं.

शरद पवार-सोनिया गांधी भेट
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत महाशिवआघाडीबाबत सकारात्मक चर्चेची शक्यता होईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील नेते चर्चा करणार आहेत.

राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते दिल्लीत बैठक
दरम्यान राज्यातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उद्या दिल्लीत जाणार आहेत. तर काँग्रेसचे नेते देखील दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. उद्या (19 नोव्हेंबर) दुपारी राज्यातील नेत्यांची बैठक होणार आहे. आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर राज्यातील नेत्यांची बैठक होणार आहे.

शिवसेना एनडीएतून बाहेर
शिवसेनाला एनडीएतून बाहेर काढण्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राउत चांगलेच आक्रमक झाले आहेत. हा निर्णय भाजपने एकट्याने कसा घेतला? त्यासाठी भाजपने बैठक घेतली होती का? असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसंच शिवसेना एनडीएतून बाहेर पडली म्हणजे यूपीएसोबत आली असं होत नाही, असंही राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या

एनडीएमधून बाहेर पडलो, म्हणजे यूपीएसोबत जाणार असं नाही : संजय राऊत

एनडीएत फूट पडणे अयोग्य, शिवसेना एनडीएमध्ये पाहिजे : रामदास आठवले

शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे बहुतांश नेते सकारात्मक, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार