नवी दिल्ली : टीम इंडियाचा गोलंदाजी सल्लागार झहीर खानसोबत बीसीसीआयने 150 दिवसांचा करार केला आहे. म्हणजेच झहीर टीमसोबत वर्षातून केवळ 150 दिवस राहिल. क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) सदस्य सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली.


झहीरला 150 दिवसांसाठी करारबद्ध करण्यात आलं आहे. झहीरची नियुक्ती दौऱ्यांवर आधारित असेल, असं बीसीसीआयनेही अगोदरच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वर्षातून जवळपास पाच महिने झहीर टीम इंडियासोबत असेल, हे स्पष्ट झालं आहे.

झहीरची 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस संघासोबत राहण्याची इच्छा नव्हती, असं बोललं जातं. मात्र सीएसीने 150 दिवसांचा आग्रह केल्यानंतर झहीरने होकार दिला.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती केल्यानंतर वाद सुरु झाला. त्यातच आता सहाय्यक स्टाफच्या नियुक्तीवरुनही वाद सुरु झाला आहे.

रवी शास्त्रींना झहीर खान गोलंदाजी सल्लागार म्हणून नको आहे. कारण त्यांना त्यांचे विश्वसनीय भरत अरुणची गोलंदाजी सल्लागारपदी निवड करायची आहे, असं बोललं जात होतं. त्यानंतरच या नव्या वादाला तोंड फुटलं.