भोपाळ : मध्य प्रदेशातील महसूल विभागाच्या महिला अधिकारी अमिता सिंह तोमर यांनी राज्य सरकारकडून वारंवार केल्या जात असलेल्या बदल्यांना वैतागून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.


तहसीलदार अमिता सिंह तोमर यांची दोन दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली. त्यांची ही 13 वर्षांच्या सेवेतील नववी बदली आहे. त्यांनी आतापर्यंत मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या 25 तहसील कार्यालयांमध्ये काम केलं आहे.

मध्य प्रदेश सरकारकडून वारंवार बदली केली जाते. 13 वर्षांच्या सेवेत 9 वेळा बदली करण्यात आली. वेगवेगळ्या 25 कार्यालयांमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून यात हस्तक्षेप करुन न्याय देण्याची मागणी केली, असं अमिता सिंह यांनी सांगितलं.

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये 50 लाख जिंकल्यामुळे आणि फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे काही दिवसांपूर्वी अमिता सिंह चर्चेत आल्या होत्या. स्वखर्चाने ग्वालियर या माझ्या मूळ जिल्ह्यात बदली करावी, अशी विनंती सरकारला केली होती. मात्र तसं न करता ग्वालियरपासून 500 किमी दूर असलेल्या सीधीमध्ये बदली करण्यात आली. काही बड्या लोकांचे अतिक्रमण हटवले होते, त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरुन सरकारने बदली केली, असा आरोपही अमिता सिंह यांनी केला.

तहसीलदारांची संपूर्ण नोकरी 3 ते 4 जिल्ह्यांमध्येच संपते. मात्र मला आतापर्यंत 25 कार्यालयांमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. ज्यामध्ये 9 बदल्यांचा समावेश आहे. याबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण आणि महसूल सचिवांनाही पत्र लिहिलं असल्याचं अमिता सिंह यांनी सांगितलं.