Virat Kohli : जागतिक क्रिकेटमधील सर्वात दमदार फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट मागील काही काळापासून शांत आहे. त्याच्या लौकिकास साजेसा खेळ त्याला करता येत नाहीये. दरम्यान खराब फॉर्मनंतरही 'भारताला टी20 विश्वचषक आणि आशिया कप मिळवून देण्यासाठी मी अजूनही खेळत आहे.' असं विराट म्हणाला आहे. 


सध्या खेळणाऱ्या सर्व खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक शतकं विराटच्या नावावर आहेत. पण मागील काही काळापासून मात्र तो हवी तशी कामगिरी करत नसल्याचं दिसून येत आहे. नोव्हेंबर 2019 पासून विराटनं एकही शतक झळकावलेलं नाही. त्यात काही काळापूर्वी त्याने कर्णधारपदांचाही राजीनामा दिला. मागील बराच काळ कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघाचं कर्णधारपद सांभाळलेल्या विराटने सर्व पदं सोडली आहेत. पण त्यानंतरही आयपीएल 2022 मध्ये विराटला खास कामगिरी करता आलेली नाही. या साऱ्याबाबत बोलताना विराटने,'मागील इतकी वर्षे देशासाठी, जवळपास सात वर्षे कर्णधार म्हणून आणि आयपीएलमध्येही खेळताना अनेक उतार-चढाव आले आहेत. पण या साऱ्यानंतरही पराभूत न होता भारताला यंदा आशिया कप आणि टी20 विश्वचषक या भव्य स्पर्धांमध्ये विजय मिळवून देणंच माझं लक्ष्य आहे.' असं विराट म्हणाला आहे.    


IPL 2022 मध्ये विराट कोहली


यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नसली तरी गुजरातविरुद्ध त्याने 73 धावा ठोकत फॅन्सना खूश केलं आहेत. त्यामुळे 14 सामन्यात कोहलीच्या नावावर 309 धावा जमा झाल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीचा सर्वोत्कृष्ट धावसंख्या 73 झाली आहे. 


हे देखील वाचा-