Team india in T20 World Cup 2022 : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि 1983 चे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) कायमच आपल्या विधानांमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सहभागी भारतीय संघाबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. कपिल देव यांच्या मते, भारतीय संघ यावेळच्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची केवळ 30 टक्के शक्यता आहे.


कपिल देव लखनौमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “टी-20 क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने एक सामना जिंकला तर तो दुसरा सामना लगेच गमावू शकतो. अशा परिस्थितीत आताच भारत यंदा विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतांबद्दल बोलणे चुकीचे ठरेल. आधी भारत सेमीफायनलमध्ये पोहोचता का? याबाबतही मला चिंता वाटते. यंदा टॉप 4 मध्ये पोहोचण्याची भारताची शक्यता माझ्या मते 30 टक्के इतकीच आहे.


ऑलराऊंडर संघासाठी महत्त्वाचे


खेळाडूंबाबत बोलताना कपिल देव म्हणाले, “संघात अष्टपैलू खेळाडू अत्यंत महत्त्वाचे असतात. ऑलराऊंडर केवळ विश्वचषकच नव्हे तर इतर सामनेही जिंकून देऊ शकतात. हार्दिक पंड्या हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा क्रिकेटपटू आहे. अष्टपैलू खेळाडू हे कोणत्याही संघाचे प्रमुख खेळाडू असतात. हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू संघात आल्यानंतर रोहित शर्माला सहावा गोलंदाज म्हणून त्याचा वापर करता येऊ शकत.''


सराव सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर मात


टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे दोन सराव सामने होणार होते. यातील पहिला सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत खेळला, जो भारताने 6 धावांनी जिंकला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता भारत सुपर-12 मधील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी अर्थात रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.


विश्वचषक संघात बुमराहच्या जागी शमीची एन्ट्री


भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्वचषक अगदी तोंडावर असताना दुखापत झाली. त्यामुळे भारतात बुमराहच्या जागी कोण खेळणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता. ज्यानंतर नुकतीच टीम इंडियाने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बुमराहच्या जागी संघात एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता बुमराहच्या जागी शमी आल्यानंतर T20 विश्वचषकासाठी भारताचे अंतिम 15 खेळाडूंची यादी समोर आली आहे.


असा आहे भारतीय संघ-


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह


राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर 


हे देखील वाचा-


Shaheen Afridi : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीची घातक गोलंदाजी, सराव सामन्यात विकेट घेत फलंदाजाला केलं Injured