ICC T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सुपर 12 फेरीतील सामन्यातील आपल्या चौथ्या सामन्यात भारतानं बांग्लादेशविरुद्ध (IND vs BAN) पाच धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचलाय. भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर झालाय. दरम्यान, अॅडलेडमध्ये आज बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात थरार पाहायला मिळला. एकेकाळी सामन्यात बांगलादेशच्या संघाचं पारडं जड दिसत होतं. मात्र, बांगलादेशच्या डावातील सातव्या षटकानंतर पावसाला सुरुवात झाली आणि सामना रोखण्यात आला. त्यानंतर बांगलादेशसमोर 16 षटकात 151 धावांचं नवं लक्ष्य ठेवण्यात आलं. या सामन्यात अनेकद टर्निंग पॉईंट पाहायला मिळाले. आज अॅडलेड येथील पाऊस थांबला नसता तर, कदाचित बांगलादेशचा संघ डकवर्थ लुईसच्या नियमांतर्गत 17 धावांनी विजयी ठरला असता.


भारताच्या विजयाची 5 कारणं


केएल राहुलचा कमबॅक
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये केएल राहुल फ्लॉप ठरला होता. एवढेच नव्हे तर, त्याला संघातून वगळण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, बांगलादेशविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या सामन्यात केएल राहुलला हलक्यात घेतलं जाऊ शकत नाही, हे दाखवून दिलं. त्यानं अवघ्या 32 चेंडूत 50 धावांची खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. 


अॅडलेडमध्ये विराटची चमक कायम
विराट कोहलीचं अॅडलेड ओव्हलशी नातं खूप जुनं आहे. विराट जेव्हा या मैदानावर फलंदाजीसाठी उतरतो, तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा येतील, याची खात्री असते. बांगलादेशविरुद्ध सामन्यातही विराटच्या बॅटीतून धावा निघाल्या. या सामन्यात विराट कोहलीनं 44 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.


सूर्यकुमार यादवची महत्वपूर्ण खेळी
आयसीसी टी-20 क्रमवारीतील अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादवनं महत्वपूर्ण खेळी केली. त्यानं 16 चेंडूंचा सामना करत 30 धावांचं योगदान दिलं. भारताची धावसंख्या 180 पुढं नेण्यात सूर्यकुमार यादवनं महत्त्वाची भूमिका बजावली.


केएल राहुलचा जादुई रनआऊट
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासचा रौद्रवतार पाहायला मिळाला. त्यानं अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक ठोकून आपली भूमिका स्पष्ट केली. लिटन दासची आक्रमक खेळी भारताच्या विजयात आडवी येत असल्याचं चित्र निर्माण झालं असताना केएल राहुलनं डीप मिड विकेटवरून डायरेक्ट थ्रो करून लिटन दासचा डाव संपुष्टात आणला. बांगलादेशसाठी लिटन दासनं अवघ्या 27 चेंडूत 60 झंझावाती खेळी केली.


भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या डावातील सातव्या षटकानंतर पावसाला सुरुवात झाली. ज्यामुळं थोड्यावेळाकरीता हा सामना रोखण्यात आला. त्यावेळी बांगलादेशची धावसंख्या 66 इतकी होती. मात्र, पुन्हा सामना सुरू झाला तेव्हा 20 षटकांत 185 धावांचं लक्ष्य 16 षटकांत 151 धावांचं करण्यात आलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत बांगलादेशच्या संघाला बॅकफूटला ढकललं. या सामन्यात अर्शदीप सिंह, हार्दिक पांड्याला प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. तर, मोहम्मद शामीच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली. 


हे देखील वाचा-